G-PZND2NBDJ8
श्री खंडोबा देवस्थान , अणदूर - नळदुर्ग : संपर्क ७३८७९९४४११ ... Shri Khandoba Devasthan, Andur-Naldurg: Contact 7387994411

अणदूर - नळदुर्गचे खंडोबा मंदिर दर रविवारी बंद




अणदूर - तुळजापूर तालुक्यातील अणदूर - नळदुर्गचे श्री खंडोबा  मंदिर यापुढे  दर रविवारी बंद राहणार आहे. प्रशासनाच्या आदेशानुसार हा निर्णय घेण्यात आला असून, भाविकांनी पुढील आदेश येईपर्यंत रविवारी दर्शनासाठी येऊ नये, असे आवाहन  मंदिर समितीच्या वतीने करण्यात आले आहे. 


कोरोना रुग्णाची संख्या वाढल्यामुळे  उस्मानाबाद जिल्ह्यात दर रविवारी जनता कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. तसेच दर रविवारी मंदिरे आणि  प्रार्थनास्थळेही  बंद राहणार आहेत, प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत अणदूर - नळदुर्गचे  श्री खंडोबा मंदिर दर रविवारी बंद  ठेवण्याचा निर्णय मंदिर समितीने घेतला आहे. 


अणदूर - नळदुर्गचे श्री खंडोबा मंदिर  जागृत देवस्थान असल्याने दर रविवारी दोन्ही ठिकाणी भाविकांची  मोठी गर्दी असते. भाविकांनी यापुढे पुढील आदेश येईपर्यंत दर रविवारी दर्शनासाठी येऊ नये, असे आवाहन मंदिर समितीचे सचिव सुनील ढेपे यांनी केले आहे. 

कोरोनाचा फटका : नळदुर्गच्या श्री खंडोबाची महायात्रा रद्द




नळदुर्ग : अणदूर पाठोपाठ नळदुर्गच्या श्री खंडोबा यात्रेला कोरोना महामारीचा फटका बसला आहे. २७ ते २९ जानेवारी रोजी भरणारी महायात्रा रद्द करण्यात आली आहे. या तिन्ही दिवशी मंदिर परिसरात संचारबंदी लागू करण्यात येणार  आहे, मात्र प्रमुख मानकरी आणि पुजारी यांच्या उपस्थितीमध्ये सर्व धार्मिक विधी पार पडणार आहेत. 


 मैलारपूर ( नळदुर्ग ) येथील श्री खंडोबा असंख्य लोकांचे कुलदैवत आहे. त्यामुळे महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश या तीन राज्यातून किमान पाच ते सात लाख भाविक यात्रेसाठी हजेरी लावत असतात. श्री खंडोबा - बाणाई विवाहस्थळ असल्यामुळे आणि जवळच भुईकोट किल्ला असल्यामुळे यात्रेला मोठी गर्दी असते. 


यंदाची यात्रा दि. २७ ते २९ जानेवारी रोजी भरणार होती. २८ जानेवारी रोजी छबिना निघणार होता. २९ जानेवारी रोजी कुस्तीचा फड रंगणार होता. मात्र कोरोना महामारीमुळे यात्रा रद्द करण्यात आली आहे तसेच कुस्त्या होणार नाहीत. आजपर्यंतच्या इतिहासात प्रथमच यात्रा रद्द करण्यात आली आहे. 


२७ ते २९ जानेवारी दरम्यान   मैलारपूर  मंदिराकडे जाणारे सर्व रस्ते बंद करण्यात येणार आहेत. तसेच व्यवसायीकांना दुकान लावण्यास मनाई करण्यात येणार आहे. याबाबत रविवारी झालेल्या शांतता कमिटीच्या बैठकीत नियमावली वाचून दाखवण्यात आली. यावेळी पोलीस अधिकारी , आरोग्य विभाग, नगर पालिका कर्मचारी, मानकरी, पुजारी, लोकप्रतिनिधी व प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. 


धार्मिक विधी पार पडणार 


कोरोना महामारीमुळे महायात्रा रद्द करण्यात आली असली तरी सर्व धार्मिक कार्यक्रम पार पडणार आहेत.  २७ ते  २९ जानेवारी हे तीन मंदिर परिसरात संचारबंदी लागू करण्यात येणार आहे.नळदुर्ग व अणदुरच्या प्रत्येकी पंचवीस मानक-यांना या काळात पारंपरिक विधी करण्यासाठी प्रवेश देण्यात येणार आहे. यावेळी मैलारपूर मंदिराकडे येणारे सर्व रस्ते भाविकांसाठी बंद करण्यात येणार आहेत. बाहेर गावच्या भाविकांनी याची नोंद घेऊन सहकार्य करावे,  असे आवाहन मंदिर समितीच्या वतीने करण्यात आले आहे. 

Read More

https://osmanabadlive.com/breaking-news/coronas-blow-shri-khandobas-mahayatra-of-naldurg-canceled/cid2080221.htm

अणदूर खंडोबा मंदिराची छायाचित्रे











कोरोनाचा फटका : अणदूरच्या श्री खंडोबा यात्रेवर बंदी

प्रथेप्रमाणे ५० लोकांच्या उपस्थितीमध्ये मूर्ती नळदुर्गला जाणार 






अणदूर - तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथील श्री खंडोबा यात्रेला यंदा कोरोनाचा फटका बसला आहे.  १५ डिसेंबर रोजी होणारी यात्रा  रद्द करण्यात आली आहे. मात्र प्रथेप्रमाणे श्री खंडोबाची मूर्ती ५० लोकांच्या उपस्थितीमध्ये  नळदुर्गला नेण्यात येणार आहे. 


अणदूर आणि नळदुर्ग मध्ये श्री खंडोबाचे दोन वेगवेगळे मंदिर असून, श्री खंडोबाची मूर्ती अणदूर येथे सव्वा दहा महिने तर नळदुर्ग येथे पावणे दोन महिने असते.गेल्या सातशे वर्षापासून ही रूढी - परंपरा सुरु आहे. अणदूरची यात्रा झाली मूर्ती नळदुर्गला नेली जाते. यंदा १५ डिसेंबर रोजी अणदूरची यात्रा होती. 


कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अणदूरची  यात्रा रद्द करण्यात आली आहे. अणदूर आणि नळदुर्गचे  प्रमुख मानकरी, विश्वस्त मंडळ, पुजारी यांच्या उपस्थितीमध्ये लेखी करार करून मूर्ती नळदुर्गला नेण्यात येणार आहे, मात्र यात्रा होणार नाही., असे प्रशासनाने कळविले आहे. 


मंदिर परिसरात प्रासादिक भांडार दुकाने लावण्यास तसेच  हॉटेल, खेळणी दुकाने , पाळणे लावण्यास बंदी  घालण्यात आली आहे. यादिवशी भाविकांनी गर्दी करू नये असे आवाहन करण्यात आले आहे. 


नळदुर्गच्या मंदिराची रंगरंगोटी सुरु 


श्री खंडोबाचे १६ डिसेंबर रोजी पहाटे नळदुर्गच्या  श्री खंडोबा मंदिरात  आगमन होणार आहे. या मंदिराची सध्या  रंगरंगोटी सुरु असून त्याचे काम अंतिम टप्पात आहे. 


श्री खंडोबाचे अणदूरहुन नळदुर्गमध्ये आगमन

नळदुर्ग: अणदूरची यात्रा पार पडल्यानंतर  श्री खंडोबाच्या मूर्तीचे अणदूर येथील मंदिरातून नळदुर्ग (मैलारपूर) येथील मंदिरात गुरुवारी (ता.28) पहाटे चार वाजता वाजत-गाजत पालखीतून आगमन झाले. यावेळी मूर्ती देवाणघेवाणीबाबत नळदुर्गचे मानकरी व अणदूरचे मानकरी यांच्यामध्ये पूर्वापार चालत आलेला लेखी करार झाला. नळदुर्गकरांनी मैलारपूर मंदिर मार्गावर आकर्षक रांगोळीच्या पायघड्या घातल्या होत्या.

अणदूर आणि नळदुर्ग ही दोन वेगवेगळी गावे असून, दोन्ही गावात चार किलोमीटर अंतर आहे. या दोन्ही गावात श्री खंडोबाची मंदिरे असली तरी मूर्ती मात्र एकच आहे. श्री खंडोबाची मूर्ती अणदूर येथे सव्वा दहा महिने तर नळदुर्ग येथे पावणे दोन महिने असते. अणदूरहुन नळदुर्गला आणि नळदुर्गहुन अणदूरला मूर्ती नेताना दोन्ही गावातील मानकऱ्यात मूर्ती नेण्या - आणण्याचा लेखी करार केला जातो. राज्यातील नव्हे देशातील हे एकमेव उदाहरण आहे.

मानकऱ्यांमध्ये लेखी करार
श्री खंडोबा व बाणाईचा विवाह नळदुर्ग येथे झाल्याची आख्यायिका असल्यामुळे नळदुर्ग (मैलारपूर) हे खंडोबाच्या भाविकांसाठी महत्त्वाचे क्षेत्र आहे.  अणदूर येथील यात्रा बुधवारी (ता. 27) मोठ्या भक्तिभावाने आणि धार्मिक कार्यक्रमांनी पार पडली. बुधवारी रात्री छबिन्याची सांगता होऊन नळदुर्गच्या मानकऱ्यांचे आगमन झाले. अणदूर व नळदुर्ग या दोन्ही गावांच्या मानकऱ्यांमध्ये देवाची मूर्ती नेण्याचा, तसेच आणण्याचा लेखी करार करण्यात आला. त्यानंतर मध्यरात्री म्हाळसा, हेगडीप्रधान, मार्तंड भैरव यांच्या मूर्ती नळदुर्गकडे मार्गस्थ झाल्या.

विधिवत पूजा करून मूर्तींची प्रतिष्ठापना
गुरुवारी पहाटे तीन वाजता श्री खंडोबाची मुख्य मूर्ती पालखीतून नळदुर्गकडे मार्गस्थ झाली. पहाटे पाच वाजता मैलारपूर-नळदुर्गमध्ये आगमन झाले. त्यानंतर विधिवत पूजा करून सर्व मूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली. पुढील पावणे  दोन महिने श्री खंडोबा मूर्ती मैलारपूर येथे वास्तव्यास असणार आहे. पौष पौर्णिमेस (10 व 11 जानेवारी) यात्रोत्सव साजरा होणार आहे. या यात्रेस महाराष्ट्रासह कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेशातून लाखो भाविक दर्शनासाठी येतात.


अणदूरच्या श्री खंडोबाची यात्रा २७ नोव्हेंबर रोजी

अणदूर - तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथील कुलदैवत श्री खंडोबाची यात्रा येत्या २७  नोव्हेंबर रोजी भरत आहे. यात्रेनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्‍यात आले असून यात्रेची जय्यत करण्‍यात येत आहे. 

अणदूरच्या यात्रेनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ९ .३० वाजता श्री खंडोबाची महापूजा होईल. दिवसभर भंडारा - खोबरे उधळणे, महानैवेद्य दाखवणे आदी कार्यक्रम पार पडतील. रात्री दहा वाजता श्रीचा छबीना - मिरवणुक काढण्यात येईल. रात्री १२ वाजता नळदुर्गच्या मानकर्यांचे आगमन, त्यानंतर मानपानाचा कार्यक्रम होईल. त्यानंतर अणदूर-मैलारपूर(नळदुर्ग) च्या मानकर्यांत खंडोबाची मूळ मूर्ती नेणे व आणण्याचा लेखी करार होईल. मध्यरात्री २.३० वाजता खंडोबाच्या मूर्तीच्या पालखीचे मैलारपूर (नळदुर्ग) कडे प्रस्थान होईल. पहाटे ५ वाजता मैलारपूर (नळदुर्ग) मंदिरात खंडोबाचे आगमन नंतर विधीवत प्रतिष्ठापना केली जाईल.
 
अणदूरच्या यात्रेनिमित्त श्री. खंडोबाच्या मंदिरावर विद्युत रोषणाई करण्यात येणार आहे, तसेच भाविकांसाठी विविध सोयी सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. श्री खंडोबा मंदिर समिती व श्री खंडोबा यात्रा कमिटी यात्रा सुरळीतपणे पार पाडण्यासाठी परिश्रम घेत आहे.
 
श्री खंडोबा आणि बाणाई विवाहस्थळ
श्री खंडोबा हा महादेवाचा अवतार असून खंडोबाची महाराष्ट्रात ८  प्रमुख ठिकाणे आहेत, पैकी अणदूर-मैलारपूर (नळदुर्ग) महत्वाचे स्थान म्हणून ओळखले जाते. दमयंती राणीच्या भक्तीसाठी श्री खंडोबा नळदुर्ग येथे प्रकट झाले, अशी आख्यायिका आहे. श्री खंडोबा आणि बाणाई यांचा विवाह नळदुर्ग जि. उस्मानाबाद येथे झाला होता म्हणून या स्थानाला अन्यन्यसाधारण महत्व आहे,  आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे अणदूर व मैलारपूर (नळदुर्ग) या दोन्ही ठिकाणी खंडोबाची मंदिरे असून दोन्ही ठिकाणचे अंतर चार कि.मी. आहे. खंडोबाचे अणदूर येथे सव्वा दहा महिने व मैलारपूर (नळदुर्ग) येथे पावणे दोन महिने वास्तव्य असते. अणदूरच्या यात्रेनंतर खंडोबाचे मैलारपूर (नळदुर्ग) कडे प्रस्थान होणार आहे.
 
२८ नोव्हेंबर रोजी कुस्तीचा आखाडा
यात्रेच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे २८ नोव्हेंबर रोजी कुस्तीचा भव्य आखाडा भरणार आहे, या आखाड्यात महाराष्ट्रातील नामवंत पैलवान हजेरी लावणार असून, ११ हजार ते ५१ हजार बक्षिस ठेवण्यात आले आहे, त्याची जय्यत तयारी सुरु आहे, 
 
 

सुपरफास्ट युगातही कावडीने पाणी आणण्याची प्रथा कायम

अणदूरच्या श्री खंडोबास श्रावण महिन्यात नागझरीचे पाणी

अणदूर - तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथील प्रसिध्द देवस्थान श्री खंडोबास संपूर्ण श्रावण महिन्यात नळदुर्गच्या नागझरी झ-याच्या पाण्याने अंघोळ घालून अभिषेक केला जातो.नागझरीचे पाणी माणसाच्या खांद्यावर कावड ठेवून घागरीव्दारे आणण्यात येते.सध्याच्या सुपरफास्ट युगात कावडीने पाणी आणण्याची ही प्रथा अजूनही कायम आहे.यंदाचा मान पुजारी अंकुश￰ सुभाष मोकाशे आणि शुभम कालीदास मोकाशे यांना देण्यात आला आहे.


नळदुर्गच्या भुईकोट किल्ल्यात नळ आणि दमयंती हे राजा - राणी राहत होते.दमयंती राणीच्या भक्तीसाठी श्री खंडोबा आदीमैलारहून नळदुर्गात प्रकट झाले आणि तिच्याच भक्तीसाठी बाणाईस चंदनपुरीहून नळदुर्गात आणून विवाह केला आणि नंतर जेजुरीस प्रस्थान केले,ही अख्यायिका प्रसिध्द आहे.नंतर नळ राजाने नळदुर्गजवळील बोरी नदीजवळ मंदिर बांधून श्री खंडोबाच्या स्वयंभू मुर्तीची प्रतिष्ठापणा केली.श्री खंडोबाची स्वयंभू मुर्ती नळदुर्गच्या भुईकोट किल्ल्यातील उपल्या बुरूजाजवळ सापडली आहे.

कालांतराने श्री खंडोबाचे मंदिर अणदूर येथे बांधण्यात आले.नंतर अणदूर आणि नळदुर्गच्या ग्रामस्थात करार होवून श्री खंडोबाची मुर्ती नेण्या आणण्याचा करार झाला.अणदूर आणि नळदुर्ग हे अंतर चार ते साडेचार किलोमीटर आहे.श्री खंडोबाचे अणदूर येथे सव्वा दहा महिने आणि नळदुर्ग येथे पावने दोन महिने वास्तव्य असते.दोन्ही ठिकाणी स्वतंत्र मंदिरे असून,देव मात्र एकच आहे.

आगळी वेगळी प्रथा
श्री खंडोबाचे वर्षभर अनेक यात्रा उत्सव असतात.श्रावण महिन्यात एक आगळीवेगळी प्रथा आहे.श्री खंडोबा हा महादेवाचा अवतार आहे.श्री खंडोबाच्या मुर्तीखाली महादेवाची पिंड अस्तीत्वात आहे.या पिंडीस आणि श्री खंडोबाच्या मुर्तीस श्रावण महिन्यात नागझरीच्या पाण्याने अंघोळ घालून अभिषेक केला जातो.नागझरी हे मैलारपूर (नळदुर्ग) मंदिराच्या जवळ डोंगर कपारीत आहे.तेथून हे पाणी माणसाच्या खांद्यावर कावड ठेवून घागरीव्दारे भल्या पहाटे आणण्यात येते.

कुठे आहे नागझरी ?
मैलारपूर मंदिरापासून वसंतनगर जाणा-या रस्त्यावर कॅनॉलच्या दक्षिण बाजूस उंच
डोंगरावर नागझरी झरा आहे.या ठिकाणी एक कुंड आहे.या झ-याचे पाणी बारा महिने असते आणि विशेष म्हणजे ते गरम असते.गेली चार वर्षे उस्मानाबाद जिल्ह्यात दुष्काळ होता,परंतु या दुष्काळातही या झ-याचे पाणी वाहत होते.हे पाणी अत्यंत शुध्द आणि निर्मळ असून,ते गंगेचे पाणी असल्याची भाविकांची धारणा आहे.


 
असा असतो दिनक्रम
यंदाचा मान अणदूरच्या पुजारी समाजातील अंकुश￰ सुभाष मोकाशे आणि शुभम कालीदास मोकाशे यांना देण्यात आलेला आहे.हे दोघे पाहटे तीन वाजता उठून अंघोळ करून धोतर (सोहळे)नेसून प्रत्येकी दोन घागरी (सोबत कावड) घेवून अनवाणी पायी (चप्पल न घालता) चालत निघतात.ते पहाटे चारपर्यंत नागझरीला पोहचतात.तेथे गेल्यानंतर परत अंघोळ करून प्रत्येकी दोन घागरी भरून कावडीने मैलारपूर मंदिरात जातात.तेथील मंदिरातील महादेवाच्या पिंडीस तांब्यातील पाणी घालून ते थेट अणदूरकडे प्रस्थान करतात.एकदा कावड उचलली की ती वाटेत कुठेही टेकावयाची नाही,असा नियम आहे.अणदूरच्या मंदिरात पहाटे साडेपाचपर्यंत ते पायी चालत पोहचतात.

मैलारपूर ते अणदूर हे अंतर चार किलोमीटर आहे.अंधा-या रात्री पावसाची तमा न बाळगता ही कावड आणली जाते.जाण्यायेण्याचे अंतर हे ९ किलोमीटर आहे.हे जिकरीचे काम अंकुश￰ सुभाष मोकाशे आणि शुभम कालीदास मोकाशे पार पाडत आहेत.कावडीने पाणी आणणे ही देवाची सेवा असून,ही सेवा करण्यात कसलेही कष्ट जाणवत नसल्याचे अंकुश￰ सुभाष मोकाशे आणि शुभम कालीदास मोकाशे सांगितले.
अणदूरच्या श्री खंडोबाची सकाळी ८ वाजता आणि रात्री ८ वाजता महापुजा होते.या दोन्ही वेळेस श्रावण महिन्यात श्री खंडोबाच्या मुर्तीस नागझरी झ-याच्या पाण्याने अंघोळ घालून अभिषेक केला जातो.इतरही महिन्यातही दोन वेळेस नित्यनियमाने पुजा होते,त्याचा मान माऊली मोकाशे यांना आहे.

खडी रविवार
श्रावण महिन्यात सर्व ठिकाणी सोमवारी उपवास केला जातो,परंतु अणदूरमध्ये रविवारी उपवास केला जातो आणि तो खडी उभा राहून केला जातो.श्री खंडोबाची सकाळी ९ वाजता पुजा आटोपली की,उपवास करणारे उभे राहतात,ते दिवसभर जेवण करत नाहीत,उभे राहूनच फराळ करतात.नंतर रात्रीची पुजा झाल्यानंतर प्रदक्षिणा संपल्यानंतर बसतात.तब्बल बारा तास उभे राहून हा उपवास केला जातो.यास खडी रविवार म्हटला जातो.किमान दीडशे ते दोनशे लोक खडी रविवारचा उपवास करतात.त्याचबरोबर रात्रीच्या पुजेच्या वेळी पुजारी समाजातील प्रत्येक घरातून एका व्यक्तीने सोहळ्यामध्ये येवून श्री खंडोबास पुजेच्या वेळी १०१ बेलपत्र घालण्याची प्रथा आहे.ही प्रथा आजही कायम आहे.

अनादी कालापासून प्रथा
अणदूरच्या श्री खंडोबास श्रावण महिन्यात नागझरीचे पाणी कावडीने आणण्याची प्रथा अनादी कालापासून सुरू आहे.ही प्रथा सध्याच्या सुपरफास्ट युगातही कायम ठेवण्यात आली आहे,असे श्री खंडोबा मंदिर समितीचे सचिव सुनील ढेपे यांनी सांगितले.

श्री खंडोबाचे अणदूरमध्ये आगमन

अणदूर - मैलारपूर ( नळदुर्ग ) येथील पावणे दोन महिन्याचे वास्तव्य संपल्यानंतर श्री खंडोबाचे बुधवारी पहाटे अणदूरमध्ये वाजत गाजत आगमन झाले.आता खंडोबाचे सव्वा दहा महिने वास्तव्य अणदूरमध्ये राहणार आहे.
अणदूर आणि नळदुर्गच्या खंडोबाची मूर्ती चल असून, अणदूरमध्ये सव्वा दहा महिने आणि नळदुर्गमध्ये पावणे दोन महिने असा मूर्ती ठेवण्याबाबत लेखी करार आहे.नळदुर्गची पौष पौर्णिमा महायात्रा संपल्यानंतर अष्टमी करून नवमीच्या पूजेला श्री खंडोबा अणदूरमध्ये येतो, त्याप्रमाणे मंगळवारी मध्यरात्री श्री खंडोबा नळदुर्गहून मार्गस्थ झाला होता.
मैलारपूरच्या श्री खंडोबा मंदिरात मंगळवारी रात्री 11 वाजता अणदूर आणि नळदुर्गच्या मानकऱ्याचे आगमन झाले, त्यानंतर सहभोजन झाल्यानंतर मंदिराच्या गाभाऱ्यात मानकऱ्याचा मानपान आणि सत्कार करण्यात आला, त्यानंतर मूर्ती नेण्याबाबत आणि आणण्याबाबत लेखी करार करण्यात आला. त्यानंतर म्हाळसा, हेगडी प्रधान, मार्तंड भेरव यांच्या मुर्त्या अणदूरकडे मार्गस्थ झाल्या, त्यानंतर श्री खंडोबाची मुख्य मूर्ती पालखीत घालून हलगीच्या तालावर वारू नाचवत अणदूरकडे मार्गस्थ झाली.
बुधवारी पहाटे चार वाजता पालखीचे वेशीत आगमन झाले, डॉल्बीच्या आवाजात श्री खंडोबाची गाणी, हलगीचा दणदणाट आणि बँडबाजा लावुन मिरवणूक निघाली, समोर फटाक्यांची आतषबाजी आणि वारूचे फटकारे यामुळे वातावरण भक्तिमय आणि प्रसन्नमय झाले होते.
देव परत येणार म्हणून समस्त अणदूरकरांनी भल्या पहाटे उठून आपल्या घरासमोर सडा टाकून रांगोळी काढली होती, तसेच गावातील सुवासिनी महिलांनी पंचारती ओवाळून देवाचे औक्षण केले,मिरवणूक जवळपास दोन तास चालली, पालखी पूर्व महाव्दारसमोर येतात गुरव - पुजारी समाजातील महिलांनी पंचारती ओवाळून देवाचे औक्षण केले, सकाळी सहा वाजता सर्व मूर्तीची अणदूरच्या मंदिरात प्रतिष्ठापना करण्यात आली. त्यानंतर सर्व भाविकांना सुनीता ढेपे - बचाटे यांच्या वतीने महाप्रसाद वाटप करण्यात आला.



नळदुर्गच्या खंडोबा मंदिराचे स्थलांतरे

नळ राजाने नळदुर्ग मध्ये रणमंडल नावाचा किल्ला बांधला..याच नळदुर्ग किल्लातील हे आहे श्री खंडोबाचे पहिले मंदिर !
इब्राहिम आदिलशाहने हे मंदिर पाडून येथे उपली बुरुज बांधला, त्यानंतर नळदुर्गपासून दोन किलोमीटर अंतरावर बोरी नदीच्या काठी मंदिर बांधण्यात आले, मात्र या मंदिरात गायीची हत्या केल्यामुळे मंदिर चार किलोमीटर अंतरावर असलेल्या अणदूरमध्ये बांधण्यात आले, छत्रपती शाहू महाराज यांनी मंदिराच्या देखभालीसाठी 500 एकर जमीन दान केली, नंतर अहिल्याबाई होळकर यांनी सभामंडप बांधला, म्हणून अणदूरचे मंदिर तीन टप्प्यात झाल्याचे दिसते,
पुढे नळदुर्ग आणि अणदूरमध्ये देवाच्या मूर्तीसाठी वाद सुरू झाला, त्यानंतर अणदूर येथे सव्वा दहा महिने आणि नळदुर्गमध्ये पावणे दोन महिने देवाची मूर्ती ठेवण्याचा करार झाला, तो करार आजही पाळला जातो..
नळदुर्गचे नवे मंदिर बोरी नदीच्या काठावर जुन्या मंदिराच्या 500 मीटर दूर बांधण्यात आले, ते कोरपे नावाच्या भक्तांने बांधले, असा दाखला मिळाला आहे. हे मंदिर बिनशिखराचे होते,सध्याच्या मंदिर समितीचे त्यावर शिखर बांधून रंगरंगोटी केली...

अणदूर आणि नळदुर्ग या दोन्ही मंदिराचे पुजारी एकच असून, ट्रस्ट सुध्दा एकच आहे..
सदानंद आणि होनकळस मोकाशे हे श्री खंडोबाचे मूळ पुजारी, त्यांचे वंशज सध्या पुजारी आहेत, मोकाशेनंतर ढेपे, ढोबळे, येळकोटे, हराळे ही पोटआडनाव पडली आहेत.अणदूरमध्ये दररोज एक पुजारी त्यांच्या हिस्साप्रमाणे बदलतात, नळदुर्गमध्ये मात्र पावणेदोन महिने चार पुजारी एकच असतात, मात्र देव अणदूरला गेल्यानंतर तेथेही हिस्साप्रमाणे रोज पुजारी बदलतात...
जेव्हा देवाची मूर्ती अणदूरला असते तेंव्हा नळदुर्गच्या मंदिरात फक्त शिवलिंग दिसते, तर मूर्ती नळदुर्गला असताना अणदूरच्या मंदिरात फक्त शिवलिंग दिसते...
श्री खंडोबा महादेवाचा अवतार असल्याने मूर्तीच्या खाली शिवलिंग दिसते...
श्री खंडोबाची मूर्तीही एक शिवलिंग असून, त्यावर हळदी चा लेप लावून नाक, डोळे बसविले जातात, त्यावर चांदीचा किरीट चढवला जातो, सकाळ आणि रात्री दोन वेळा सोहळ्यात पूजा केली जाते...रात्री शेजारती म्हटली जाते. .
दोन्ही पूजेच्या वेळी नगारा वाजवला जातो, तो मान मुस्लिम भक्त याकूब शेख कडे आहे, पूर्वी अनेक वर्षे आणखी एक मुस्लिम भक्त बाबू पिंजारी दररोज मंदिरात फुले आणून देत होते...
श्री खंडोबाचे अणदूर आणि नळदुर्गमध्ये वेगवेगळे मानकरी आहेत, यात्रा कमिटी वेगळी आहे...
अणदूर यात्रेनिमित्त कुस्त्यांचा जंगी आखाडा भरवला जातो, नळदुर्ग यात्रेनंतरही कुस्त्यांची स्पर्धा होते...
देव नळदुर्गमध्ये आल्यानंतर दर रविवारी यात्रा तर पौष पौर्णिमेला महायात्रा असते...
- सुनील ढेपे
पुजारी आणि मंदिर समिती सचिव
अणदूर - नळदुर्ग मंदिर
9420477111