G-PZND2NBDJ8
श्री खंडोबा देवस्थान , अणदूर - नळदुर्ग : संपर्क ७३८७९९४४११ ... Shri Khandoba Devasthan, Andur-Naldurg: Contact 7387994411

सुपरफास्ट युगातही कावडीने पाणी आणण्याची प्रथा कायम

अणदूरच्या श्री खंडोबास श्रावण महिन्यात नागझरीचे पाणी

अणदूर - तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथील प्रसिध्द देवस्थान श्री खंडोबास संपूर्ण श्रावण महिन्यात नळदुर्गच्या नागझरी झ-याच्या पाण्याने अंघोळ घालून अभिषेक केला जातो.नागझरीचे पाणी माणसाच्या खांद्यावर कावड ठेवून घागरीव्दारे आणण्यात येते.सध्याच्या सुपरफास्ट युगात कावडीने पाणी आणण्याची ही प्रथा अजूनही कायम आहे.यंदाचा मान पुजारी अंकुश￰ सुभाष मोकाशे आणि शुभम कालीदास मोकाशे यांना देण्यात आला आहे.


नळदुर्गच्या भुईकोट किल्ल्यात नळ आणि दमयंती हे राजा - राणी राहत होते.दमयंती राणीच्या भक्तीसाठी श्री खंडोबा आदीमैलारहून नळदुर्गात प्रकट झाले आणि तिच्याच भक्तीसाठी बाणाईस चंदनपुरीहून नळदुर्गात आणून विवाह केला आणि नंतर जेजुरीस प्रस्थान केले,ही अख्यायिका प्रसिध्द आहे.नंतर नळ राजाने नळदुर्गजवळील बोरी नदीजवळ मंदिर बांधून श्री खंडोबाच्या स्वयंभू मुर्तीची प्रतिष्ठापणा केली.श्री खंडोबाची स्वयंभू मुर्ती नळदुर्गच्या भुईकोट किल्ल्यातील उपल्या बुरूजाजवळ सापडली आहे.

कालांतराने श्री खंडोबाचे मंदिर अणदूर येथे बांधण्यात आले.नंतर अणदूर आणि नळदुर्गच्या ग्रामस्थात करार होवून श्री खंडोबाची मुर्ती नेण्या आणण्याचा करार झाला.अणदूर आणि नळदुर्ग हे अंतर चार ते साडेचार किलोमीटर आहे.श्री खंडोबाचे अणदूर येथे सव्वा दहा महिने आणि नळदुर्ग येथे पावने दोन महिने वास्तव्य असते.दोन्ही ठिकाणी स्वतंत्र मंदिरे असून,देव मात्र एकच आहे.

आगळी वेगळी प्रथा
श्री खंडोबाचे वर्षभर अनेक यात्रा उत्सव असतात.श्रावण महिन्यात एक आगळीवेगळी प्रथा आहे.श्री खंडोबा हा महादेवाचा अवतार आहे.श्री खंडोबाच्या मुर्तीखाली महादेवाची पिंड अस्तीत्वात आहे.या पिंडीस आणि श्री खंडोबाच्या मुर्तीस श्रावण महिन्यात नागझरीच्या पाण्याने अंघोळ घालून अभिषेक केला जातो.नागझरी हे मैलारपूर (नळदुर्ग) मंदिराच्या जवळ डोंगर कपारीत आहे.तेथून हे पाणी माणसाच्या खांद्यावर कावड ठेवून घागरीव्दारे भल्या पहाटे आणण्यात येते.

कुठे आहे नागझरी ?
मैलारपूर मंदिरापासून वसंतनगर जाणा-या रस्त्यावर कॅनॉलच्या दक्षिण बाजूस उंच
डोंगरावर नागझरी झरा आहे.या ठिकाणी एक कुंड आहे.या झ-याचे पाणी बारा महिने असते आणि विशेष म्हणजे ते गरम असते.गेली चार वर्षे उस्मानाबाद जिल्ह्यात दुष्काळ होता,परंतु या दुष्काळातही या झ-याचे पाणी वाहत होते.हे पाणी अत्यंत शुध्द आणि निर्मळ असून,ते गंगेचे पाणी असल्याची भाविकांची धारणा आहे.


 
असा असतो दिनक्रम
यंदाचा मान अणदूरच्या पुजारी समाजातील अंकुश￰ सुभाष मोकाशे आणि शुभम कालीदास मोकाशे यांना देण्यात आलेला आहे.हे दोघे पाहटे तीन वाजता उठून अंघोळ करून धोतर (सोहळे)नेसून प्रत्येकी दोन घागरी (सोबत कावड) घेवून अनवाणी पायी (चप्पल न घालता) चालत निघतात.ते पहाटे चारपर्यंत नागझरीला पोहचतात.तेथे गेल्यानंतर परत अंघोळ करून प्रत्येकी दोन घागरी भरून कावडीने मैलारपूर मंदिरात जातात.तेथील मंदिरातील महादेवाच्या पिंडीस तांब्यातील पाणी घालून ते थेट अणदूरकडे प्रस्थान करतात.एकदा कावड उचलली की ती वाटेत कुठेही टेकावयाची नाही,असा नियम आहे.अणदूरच्या मंदिरात पहाटे साडेपाचपर्यंत ते पायी चालत पोहचतात.

मैलारपूर ते अणदूर हे अंतर चार किलोमीटर आहे.अंधा-या रात्री पावसाची तमा न बाळगता ही कावड आणली जाते.जाण्यायेण्याचे अंतर हे ९ किलोमीटर आहे.हे जिकरीचे काम अंकुश￰ सुभाष मोकाशे आणि शुभम कालीदास मोकाशे पार पाडत आहेत.कावडीने पाणी आणणे ही देवाची सेवा असून,ही सेवा करण्यात कसलेही कष्ट जाणवत नसल्याचे अंकुश￰ सुभाष मोकाशे आणि शुभम कालीदास मोकाशे सांगितले.
अणदूरच्या श्री खंडोबाची सकाळी ८ वाजता आणि रात्री ८ वाजता महापुजा होते.या दोन्ही वेळेस श्रावण महिन्यात श्री खंडोबाच्या मुर्तीस नागझरी झ-याच्या पाण्याने अंघोळ घालून अभिषेक केला जातो.इतरही महिन्यातही दोन वेळेस नित्यनियमाने पुजा होते,त्याचा मान माऊली मोकाशे यांना आहे.

खडी रविवार
श्रावण महिन्यात सर्व ठिकाणी सोमवारी उपवास केला जातो,परंतु अणदूरमध्ये रविवारी उपवास केला जातो आणि तो खडी उभा राहून केला जातो.श्री खंडोबाची सकाळी ९ वाजता पुजा आटोपली की,उपवास करणारे उभे राहतात,ते दिवसभर जेवण करत नाहीत,उभे राहूनच फराळ करतात.नंतर रात्रीची पुजा झाल्यानंतर प्रदक्षिणा संपल्यानंतर बसतात.तब्बल बारा तास उभे राहून हा उपवास केला जातो.यास खडी रविवार म्हटला जातो.किमान दीडशे ते दोनशे लोक खडी रविवारचा उपवास करतात.त्याचबरोबर रात्रीच्या पुजेच्या वेळी पुजारी समाजातील प्रत्येक घरातून एका व्यक्तीने सोहळ्यामध्ये येवून श्री खंडोबास पुजेच्या वेळी १०१ बेलपत्र घालण्याची प्रथा आहे.ही प्रथा आजही कायम आहे.

अनादी कालापासून प्रथा
अणदूरच्या श्री खंडोबास श्रावण महिन्यात नागझरीचे पाणी कावडीने आणण्याची प्रथा अनादी कालापासून सुरू आहे.ही प्रथा सध्याच्या सुपरफास्ट युगातही कायम ठेवण्यात आली आहे,असे श्री खंडोबा मंदिर समितीचे सचिव सुनील ढेपे यांनी सांगितले.

श्री खंडोबाचे अणदूरमध्ये आगमन

अणदूर - मैलारपूर ( नळदुर्ग ) येथील पावणे दोन महिन्याचे वास्तव्य संपल्यानंतर श्री खंडोबाचे बुधवारी पहाटे अणदूरमध्ये वाजत गाजत आगमन झाले.आता खंडोबाचे सव्वा दहा महिने वास्तव्य अणदूरमध्ये राहणार आहे.
अणदूर आणि नळदुर्गच्या खंडोबाची मूर्ती चल असून, अणदूरमध्ये सव्वा दहा महिने आणि नळदुर्गमध्ये पावणे दोन महिने असा मूर्ती ठेवण्याबाबत लेखी करार आहे.नळदुर्गची पौष पौर्णिमा महायात्रा संपल्यानंतर अष्टमी करून नवमीच्या पूजेला श्री खंडोबा अणदूरमध्ये येतो, त्याप्रमाणे मंगळवारी मध्यरात्री श्री खंडोबा नळदुर्गहून मार्गस्थ झाला होता.
मैलारपूरच्या श्री खंडोबा मंदिरात मंगळवारी रात्री 11 वाजता अणदूर आणि नळदुर्गच्या मानकऱ्याचे आगमन झाले, त्यानंतर सहभोजन झाल्यानंतर मंदिराच्या गाभाऱ्यात मानकऱ्याचा मानपान आणि सत्कार करण्यात आला, त्यानंतर मूर्ती नेण्याबाबत आणि आणण्याबाबत लेखी करार करण्यात आला. त्यानंतर म्हाळसा, हेगडी प्रधान, मार्तंड भेरव यांच्या मुर्त्या अणदूरकडे मार्गस्थ झाल्या, त्यानंतर श्री खंडोबाची मुख्य मूर्ती पालखीत घालून हलगीच्या तालावर वारू नाचवत अणदूरकडे मार्गस्थ झाली.
बुधवारी पहाटे चार वाजता पालखीचे वेशीत आगमन झाले, डॉल्बीच्या आवाजात श्री खंडोबाची गाणी, हलगीचा दणदणाट आणि बँडबाजा लावुन मिरवणूक निघाली, समोर फटाक्यांची आतषबाजी आणि वारूचे फटकारे यामुळे वातावरण भक्तिमय आणि प्रसन्नमय झाले होते.
देव परत येणार म्हणून समस्त अणदूरकरांनी भल्या पहाटे उठून आपल्या घरासमोर सडा टाकून रांगोळी काढली होती, तसेच गावातील सुवासिनी महिलांनी पंचारती ओवाळून देवाचे औक्षण केले,मिरवणूक जवळपास दोन तास चालली, पालखी पूर्व महाव्दारसमोर येतात गुरव - पुजारी समाजातील महिलांनी पंचारती ओवाळून देवाचे औक्षण केले, सकाळी सहा वाजता सर्व मूर्तीची अणदूरच्या मंदिरात प्रतिष्ठापना करण्यात आली. त्यानंतर सर्व भाविकांना सुनीता ढेपे - बचाटे यांच्या वतीने महाप्रसाद वाटप करण्यात आला.



नळदुर्गच्या खंडोबा मंदिराचे स्थलांतरे

नळ राजाने नळदुर्ग मध्ये रणमंडल नावाचा किल्ला बांधला..याच नळदुर्ग किल्लातील हे आहे श्री खंडोबाचे पहिले मंदिर !
इब्राहिम आदिलशाहने हे मंदिर पाडून येथे उपली बुरुज बांधला, त्यानंतर नळदुर्गपासून दोन किलोमीटर अंतरावर बोरी नदीच्या काठी मंदिर बांधण्यात आले, मात्र या मंदिरात गायीची हत्या केल्यामुळे मंदिर चार किलोमीटर अंतरावर असलेल्या अणदूरमध्ये बांधण्यात आले, छत्रपती शाहू महाराज यांनी मंदिराच्या देखभालीसाठी 500 एकर जमीन दान केली, नंतर अहिल्याबाई होळकर यांनी सभामंडप बांधला, म्हणून अणदूरचे मंदिर तीन टप्प्यात झाल्याचे दिसते,
पुढे नळदुर्ग आणि अणदूरमध्ये देवाच्या मूर्तीसाठी वाद सुरू झाला, त्यानंतर अणदूर येथे सव्वा दहा महिने आणि नळदुर्गमध्ये पावणे दोन महिने देवाची मूर्ती ठेवण्याचा करार झाला, तो करार आजही पाळला जातो..
नळदुर्गचे नवे मंदिर बोरी नदीच्या काठावर जुन्या मंदिराच्या 500 मीटर दूर बांधण्यात आले, ते कोरपे नावाच्या भक्तांने बांधले, असा दाखला मिळाला आहे. हे मंदिर बिनशिखराचे होते,सध्याच्या मंदिर समितीचे त्यावर शिखर बांधून रंगरंगोटी केली...

अणदूर आणि नळदुर्ग या दोन्ही मंदिराचे पुजारी एकच असून, ट्रस्ट सुध्दा एकच आहे..
सदानंद आणि होनकळस मोकाशे हे श्री खंडोबाचे मूळ पुजारी, त्यांचे वंशज सध्या पुजारी आहेत, मोकाशेनंतर ढेपे, ढोबळे, येळकोटे, हराळे ही पोटआडनाव पडली आहेत.अणदूरमध्ये दररोज एक पुजारी त्यांच्या हिस्साप्रमाणे बदलतात, नळदुर्गमध्ये मात्र पावणेदोन महिने चार पुजारी एकच असतात, मात्र देव अणदूरला गेल्यानंतर तेथेही हिस्साप्रमाणे रोज पुजारी बदलतात...
जेव्हा देवाची मूर्ती अणदूरला असते तेंव्हा नळदुर्गच्या मंदिरात फक्त शिवलिंग दिसते, तर मूर्ती नळदुर्गला असताना अणदूरच्या मंदिरात फक्त शिवलिंग दिसते...
श्री खंडोबा महादेवाचा अवतार असल्याने मूर्तीच्या खाली शिवलिंग दिसते...
श्री खंडोबाची मूर्तीही एक शिवलिंग असून, त्यावर हळदी चा लेप लावून नाक, डोळे बसविले जातात, त्यावर चांदीचा किरीट चढवला जातो, सकाळ आणि रात्री दोन वेळा सोहळ्यात पूजा केली जाते...रात्री शेजारती म्हटली जाते. .
दोन्ही पूजेच्या वेळी नगारा वाजवला जातो, तो मान मुस्लिम भक्त याकूब शेख कडे आहे, पूर्वी अनेक वर्षे आणखी एक मुस्लिम भक्त बाबू पिंजारी दररोज मंदिरात फुले आणून देत होते...
श्री खंडोबाचे अणदूर आणि नळदुर्गमध्ये वेगवेगळे मानकरी आहेत, यात्रा कमिटी वेगळी आहे...
अणदूर यात्रेनिमित्त कुस्त्यांचा जंगी आखाडा भरवला जातो, नळदुर्ग यात्रेनंतरही कुस्त्यांची स्पर्धा होते...
देव नळदुर्गमध्ये आल्यानंतर दर रविवारी यात्रा तर पौष पौर्णिमेला महायात्रा असते...
- सुनील ढेपे
पुजारी आणि मंदिर समिती सचिव
अणदूर - नळदुर्ग मंदिर
9420477111

चंपाषष्ठी उत्सव आणि मैलारपूर !


चंपाषष्ठी रोजी मल्हारी मार्तंड तथा श्री खंडोबाने मणी आणि मल्ल या राक्षसाचा वध करून जनतेचे आणि ऋषीचे रक्षण केले होते. म्हणून  चंपाषष्ठी सणाला महत्व आहे.
देव दीपावली रोजी श्री महादेवाने  खंडोबाचा अवतार धारण केला आणि चंपाषष्ठी रोजी राक्षसाचा वध केला अशी आख्यायिका आहे. देव दीपावली रोजी ( १९ नोव्हेंबर ) अणदूरची यात्रा पार पडली तर चंपाषष्ठी उत्सव मैलारपूर ( नळदुर्ग) येथे होत आहे. या दिवशी श्री खंडोबाचे दर्शन घेणे अत्यंत पवित्र मानले जाते.
मैलारपूर ( नळदुर्ग) येथे आता दर रविवारी यात्रा भरणार आहे. पहिल्या रविवारी किमान २५ हजार भाविक दर्शन घेतात.जसे रविवार वाढत जातात तशी गर्दी वाढत जाते. तिसऱ्या रविवारपासून किमान ५० हजार ते १ लाख भाविक येतात. पुढे लाखाच्या पुढे भाविक येतात.
२ जानेवारी २०१८ रोजी महायात्रा आहे. या दिवशी पौष पौर्णिमा आहे. यंदा ३१ डिसेंबर रोजी रविवार, १ जानेवारी रोजी अर्धी पौर्णिमा, २ जानेवारी रोजी पौर्णिमा समाप्ती आहे.त्यामुळे ३१ डिसेंबर ते २ जानेवारी पर्यंत किमान १० लाख भाविक दर्शन घेतील, असा अंदाज  आहे.
मैलारपूर ( नळदुर्ग) येथे दर रविवारी मंदिर समितीच्या वतीने मोफत अन्नदान केले जाते. त्याचा लाभ हजारो भाविक घेत असतात. देणाऱ्याचे हात हजार, झोळी माझी फाटकी याप्रमाणे दान देणारे अनेक आहेत.
यंदा पाऊस चांगला झाल्याने पिके चांगली आली आहेत. बोरी धरणाला पाणी ओव्हर फ्लो आहे. बोरी नदी ओसंडून वाहत आहे. त्यामुळे भाविक आनंदी आहेत . जवळच  भुईकोट किल्ला आणि खंडोबाचे दर्शन असा दुग्ध शर्करा योग आहे. मैलारपूर ( नळदुर्ग) क्षेत्र तुळजापूर पासून 35 किलोमीटर आणि सोलापूर पासून 40 किलोमीटर अंतरावर आहे.
मैलारपूर ( नळदुर्ग) येथे मंदिर समिती आणि शासनाच्या वतीने अनेक विकास कामे करण्यात आली आहेत. बोरी नदीला पायऱ्या, सांस्कृतिक सभागृह, भाविकांसाठी खोल्या बांधण्यात आल्या  आहेत. मंदिराचे रंगकाम करण्यात आले आहे. यंदा आणखी विकास काम पार पडतील, भाविकांना दर्शन सुलभ व्हावे म्हणून लाकडी आणि लोखंडी बॅरेट  तयार करण्यात आले आहेत.

आख्यायिका
श्री खंडोबा बाणाईसाठी चंदनपुरी ( नाशिक) येथे बारा वर्ष मेंढपाळ म्हणून राहिला,बारा वर्षानंतर जेव्हा श्री खंडोबा मूळ अवतारात आला तेव्हा त्यांनी बाणाईस नळदुर्गमध्ये आणून विवाह केला. नळदुर्गच्या भुईकोट किल्ल्यात नळ -दमयंती राजा राणी राहत होते, दमयंती राणीच्या भक्तीसाठी श्री खंडोबा नळदुर्गमध्ये प्रगट झाले आणि तिच्याच भक्तीसाठी बाणाईशी नळदुर्मध्ये विवाह केला आणि नंतर जेजुरीकडे प्रस्थान केले.
अणदूर आणि नळदुर्ग यात चार किलोमीटर अंतर आहे. दोन्ही गावात मंदिरे आहेत मात्र देव एकच आहे. श्री खंडोबा अणदूरमध्ये सव्वा दहा महिने आणि नळदुर्गमध्ये पावणे दोन महिने मुक्कामास असतात, देव एका ठिकाणाहून  दुसऱ्या ठिकाणी नेताना कागदावर लेखी करार केला जातो. गेल्या अनेक वर्षापासून ही  परंपरा सुरु आहे. दोन्ही गावात एकोपा आहे. दोन्ही गावचे वेगवेगळे  मानकरी आहेत.
घोडे, पालखी यांचे मानकरी वेगळे आहेत. वाघ्या- मुरळी अनेक आहेत. मंदिरावर भंडारा आणि खोबरे उधळण्याची परंपरा आहे. येथे पशु हत्येला बंदी आहे. पुरण - पोळीचा नेवेध दाखवला जातो. बाजरीची भाकरी आणि वांग्याचे भरीत सोबत पातीचा कांदा हे खंडोबाचे आवडते जेवण आहे.

जुन्या काळात जेव्हा वाहनांची व्यवस्था नव्हती, तेव्हा मैलारपूर ( नळदुर्ग) येथे किमान ७०० ते १५०० बैलगाड्या येत होत्या. किमान सात दिवस यात्रा चालत असे. काळ बदलला आणि त्याची जागा   मोटारसायकल, जीप,कार, टमटम, टेम्पो, ट्र्क यांनी घेतली . यात्रेत किमान ५ किलोमीटर अंतर गर्दी दिसते. यात्रा पळती झाली.जेव्हा वीज नव्हती तेव्हा मशाली पेटवल्या जात होत्या. आता त्याची जागा मर्क्युरी लाइट घेतली आहे.
विद्युत रोषणाईने मंदिर उजाळून निघते. शोभेचे दारूकाम केले जाते. यात्रेत रंगी बेरंगी शोभेची दारू उडवली जाते.

- सुनील ढेपे
7387994411


श्री खंडोबाचे नळदुर्गमध्ये आगमन

उस्मानाबाद - जागृत देवस्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री खंडोबाचे अणदूरहुन नळदुर्गमध्ये सोमवारी पहाटे पाच वाजता वाजत गाजत पालखीतुन आगमन झाले. 10 जानेवारी 2018 पर्यंत श्री खंडोबाचे नळदुर्गमध्ये वास्तव्य राहणार आहे.
अणदूरची यात्रा रविवारी मोठया भक्तिभावाने आणि धार्मिक कार्यक्रमानी पार पडली.दिवसभर विविध कार्यक्रम पार पडल्यानंतर श्रीचा रात्री 10 वाजता वाजत गाजत छबिना काढण्यात आला. रात्री साडेबारा वाजता छबिण्याची सांगता झाली.
याचवेळी नळदुर्गच्या मानकऱ्याचे आगमन झाले. त्यानंतर पानसुपारी कार्यक्रम पार पडला, त्यानंतर मंदिराच्या गाभाऱ्यात अणदूर आणि नळदुर्गच्या मानकऱ्याचा सत्कार करण्यात आला आणि दोन्ही गावाच्या मानकऱ्यामध्ये देवाच्या मुर्त्या नेण्याचा आणि आणण्याचा लेखी करार करण्यात आला. त्यानंतर मध्यरात्री दोन वाजता म्हाळसा, हेगडीप्रधान, मार्तंड भैरव यांच्या मुर्त्या नळदुर्गकडे मार्गस्थ झाल्या, त्यानंतर पहाटे तीन वाजता श्री खंडोबाची मुख्य मूर्ती पालखीत घालण्यात आली आणि नळदुर्गकडे मार्गस्थ झाली.
पहाटे पाच वाजता सर्व मूर्त्याचे मैलारपूर - नळदुर्गमध्ये आगमन झाले,त्यानंतर विधिवत पूजा करून सर्व मुर्त्याची प्रतिष्ठापना करण्यात आली.

नळदुर्गच्या भुईकोट किल्यात श्री खंडोबाची स्वयंभू मूर्ती सापडली असून, गेल्या अनेक वर्षांपासून त्याची दोन वेळेस पूजा केली जाते, श्री खंडोबा आणि बाणाई यांचा विवाह नळदुर्गमध्ये झाल्याने या मंदिराला जेजुरी इतके महत्व आहे.

यात्रा वाढण्याचे कारण...

तुळजापूर तालुक्यातील अणदूर आणि नळदुर्ग ही दोन वेगवेगळी गावे.दोन्ही गावांत जेमतेम चार किलोमीटर अंतर. सोलापूर - हैद्राबाद हा नॅशनल हायवे चार पदरी होत असून,या दोन्ही गावापासून हा हायवे जात आहे.अणदूरला उड्डाण पूल तर नळदुर्गला बायपास करण्यात येत आहे.जो बायपास आहे,तो श्री खंडोबा मंदिरापासून जात आहे.येत्या दोन वर्षात त्याचे काम पुर्ण झाल्यानंतर मैलारपूरच्या मंदिराला आणखी विशेष महत्व येणार आहे.
नळदुर्गचे श्री खंडोबा मंदिर बोरी नदीच्या काठावर बांधण्यात आले आहे.ते नळदुर्गपासून एक किलोमीटर अंतरावर आहे.या ठिकाणी लोकवस्ती नाही.श्री खंडोबाचे अणदूर येथे सव्वा दहा महिने आणि मैलारपूरमध्ये पावणे दोन महिने वास्तव्य असते.यात्रोत्सव मैलारपूरमध्ये श्रीची मुर्ती असताना असतो.दर रविवारी मोठी यात्रा भरते.सलग पाच रविवार झाल्यानंतर पौष पोर्णिमेला महायात्रा भरते.त्यानंतर एक रविवार होतो.अष्टमी करून नवमीला श्री खंडोबाचे अणदूरला प्रस्थान होते.गावे दोन,मंदिरे दोन पण देव एक आहे.दोन्ही मंदिराचे पुजारी एकच असून,ट्रस्ट एकच आहे.जेव्हा अणदूरहून मैलारपूरला आणि मैलारपूरहून अणदूरला देव नेला जातो,तेव्हा दोन्ही गावच्या मानक-यात एक लेखी करार केला जातो आणि मुर्तीची अदानप्रदान केली जाते.मुर्ती एका ठिकाणाहून दुस-या ठिकाणी नेताना वाजत गाजत पालखी काढली जाते.हा सोहळा अत्यंत धार्मिक आणि देखणा असतो.
श्री खंडोबा आणि बाणाईचा विवाह नळदुर्गमध्ये झालेला आहे.नळराजाची पत्नी दमयंती राणीच्या भक्तीसाठी श्री खंडोबा नळदुर्गमध्ये प्रकट झाले आणि तिच्याच भक्तीसाठी याठिकाणी बाणाईशी विवाह केला.श्री खंडोबा हा महादेवाचा अवतार आहे.महादेव म्हणजे खंडोबा आणि खंडोबा म्हणजे महादेव.महादेवाने मल्हारी मार्तंण्ड म्हणजे श्री खंडोबा अवतारामध्ये जयाद्रीशी विवाह करण्याचे वचन पार्वतीला दिले होते,त्यामुळे महादेवाने मल्हारी मार्तंण्ड अवतारात बाणाईशी विवाह केला.बाणाई म्हणजे जयाद्री आणि म्हाळसा म्हणजे पार्वती.हेगडी प्रधान म्हणजे विष्णु आहेत.मात्र दिलेल्या वचनाचा त्रास म्हाळसाला झाला.तिला ते सहन झाले नाही,त्यामुळे तिने खंडोबाला वृध्द होण्याचा श्राप दिला.त्यामुळेच श्री खंडोबाने चंदनपुरीत वृध्द होवून बाणाईच्या घरी मेंढपाळ म्हणून बारा वर्षे चाकरी केली.बारा वर्षानंतर म्हाळसाच्या श्रापातून मुक्ती मिळाल्यानंतर श्री खंडोबाने बाणाईला चंदनपुरीतून नळदुर्गात आणून विवाह केला आणि नंतर जेजुरीकडे प्रस्थान केले.त्यामुळेच या स्थानाला मोठे महत्व आहे.ही अख्यायिका फार कमी लोकांना माहीत होती.झी मराठीवरील जय मल्हार मालिकेमुळे ती लोकांसमोर आली.त्याची आम्ही भरपूर प्रसिध्दी केली.त्यामुळे यात्रा वाढली आहे.
श्री खंडोबाची पौष पोर्णिमा यात्रा यंदा रेकॉर्डब्रेक झाली.दर रविवारी मिनी यात्रा भरली.दुष्काळी परिस्थिती असतानाही भाविक मोठ्या संख्येने मैलारपुरात आले.अणदूरला गर्दी वाढली आहे.याचे श्रेय झी मराठीला आणि आम्ही केलेल्या प्रसिध्दीला आहे.
माझ्या सर्व पत्रकार बांधवांनी मला साथ दिली,वृत्तपत्रात सर्व बातम्या आल्या.सोशल मीडियाच्या माध्यमातून आम्ही अनेकाजवळ पोहचलो.चॅनलवर कधी नव्हे बातम्या झळकल्या.त्याचा इम्पॅक्ट आला.यात्रा मोठी होणे आपली संस्कृती आहे.यानिमित्त लोकांना भेटता येते,रोजच्या कटकटीच्या आणि धावपळीच्या जीवनात कुठे तरी मनशांती लाभते.
श्री खंडोबाचा एक पुजारी,मंदिर समितीचा सचिव म्हणून भाविकांची सेवा करणे हे माझे कर्तव्य समजले.जे जे करता येईल,ते करण्याचा प्रयत्न केला.भविष्यात अनेक योजना आहेत,त्या साकार झाल्यानंतर आपणास कळवण्यात येईलच...मैलारपूरची यात्रा शांततेत आणि सुरळीत पार पाडण्यासाठी दोन्ही गावचे मानकरी,यात्रा कमिटी,नागरिक,नळदुर्ग नगर परिषद,अणदूर ग्रामपंचायत,पुजारी मंडळ,पोलीस,प्रशासन,पत्रकार या सर्वाचे सहकार्य लाभले.त्या सर्वांचा आभारी आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यात तुळजापूरची तुळजाभवानीची यात्रा सर्वात मोठी भरते.त्यानंतर येरमाळ्याच्या येडेश्वरीचा नंबर लागतो.आता श्री खंडोबाची यात्राही मोठी होवू लागली आहे.तुळजापूरपासून मैलारपूर आणि अणदूर फक्त ३५ किलोमीटर आहे.सोलापूरपासून ४० किलोमीटर आहे.तुळजापूर,मैलारपूर - अणदूर आणि अक्लककोट हे एकाच मार्गावर आहेत.भाविकांना एकाच वेळी ही तिर्थयात्रा करता येवू शकते...
पुनश्च आभार...




# सुनील ढेपे 
 


9420477111

दमयंतीच्या भक्तीसाठी श्री खंडोबा - बाणाई विवाह नळदुर्गमध्ये...

मणी आणि मल्ल या उन्मत्त दैत्यांचा वध करण्यासाठी महादेव तथा शंकराने श्री खंडोबा तथा मल्हारी मार्तंडाचा अवतार धारण केला, ही आख्यायिका सर्वश्रुत आहे.मात्र श्री खंडोबा नळदुर्ग आणि अणदूरमध्ये कसे प्रकट झाले,या स्थानाचे महत्व काय,याची आख्यायिका थोडक्यात अशी ....
कृतयुगामध्ये नळदुर्ग येथील भुईकोट किल्ल्यात नळ - दमयंती राजा राणी - रहात होते.(नंतरचे नळ - दमयंती राजा राणी वेगळे आहेत). दमयंती राणी ही श्री खंडोबाची निस्सीम भक्त होती.राणी रोज पहाटे उठून  श्री खंडोबाच्या दर्शनासाठी आदी - मैलार (बीदरपासून दहा किलोमीटर अंतरावर,कर्नाटक राज्य) येथे जात होती.किल्ल्यामध्येच असलेल्या एका कल्पवृक्षावर बसून राणी आदी मैलारला जात असल्याचे मार्तण्ड भैरव ग्रंथामध्ये लिहिले आहे.( झी मराठीच्या  जय मल्हार मालिकेमध्येही हेच दाखवण्यात आले आहे) एक वर्षे उलटून गेल्यानंतर एकेदिवशी राजा पहाटे उठला तर राणी दिसेना,तेव्हा त्याला संशय आला आणि दुस-या दिवशी तिला न सांगता,तिच्या पाठीमागे गेला. राणी कल्पवृक्षावर बसली होती तर राजा झाडाच्या पारंब्या धरून लोंबकळत आदी मैलारला गेला.
राणी जेव्हा मंदिरात गेली, तेव्हा श्री खंडोबाने तुझा पती मागे लपला असल्याचे सांगून त्या दिवशी दर्शन दिले नाही. तेव्हा राजाने माफी मागून श्री खंडोबास नळदुर्गमध्ये प्रकट होण्याची विनंती केली. त्यानंतर दमयंतीच्या भक्तीसाठी आणि नळ राजाच्या विनंतीनुसार श्री खंडोबा नळदुर्गमध्ये प्रकट झाले.
श्री खंडोबाने दमयंती राणीला दिलेल्या दृष्टांताप्रमाणे नळ राजाने (आज ज्या ठिकाणी उपली बुरूज उभा आहे )त्या ठिकाणी मजुराकरवी खोदकाम केले असता, एका दगडी मुर्तीतून रक्ताची धार वरती आली.तोच दगड (तांदळा) राजाने श्री खंडोबाची मूर्ती म्हणून प्रतिष्ठापना केली. म्हणूनच या दगडी मुर्तीवर एका बाजूला खच पडलेली आजही दिसते. ही दगडी मूर्ती स्वयंभू असून,ती जागृत आहे.पुढे दमयंती राणीच्या भक्तीसाठी श्री खंडोबाने बाणाईला चंदनपुरीतून आणून याच भुईकोट किल्ल्यात लग्न केले आणि नंतर जेजुरीला नेले.श्री खंडोबा आणि बाणाईच्या विवाहस्थळामुळे श्री क्षेत्र अणदूर - मैलारपूर (नळदुर्ग) ला विशेष महत्व आहे.
कालांतराने नळ राजाने बांधलेले मंदिर १६६४ मध्ये इब्राहिम आदीलशहाने उद्ध्वस्त करून त्या ठिकाणी उपली बुरूज बांधला. त्यानंतर  श्री खंडोबाचे मंदिर बोरी नदीच्या काठावर बांधण्यात आले.या मंदिरातही १७ व्या शतकात एक अनिष्ट कृत्य करून मंदिर भ्रष्ट करण्यात आले, नंतर श्री खंडोबा मंदिर अणदूरला बांधण्यात आले. अणदूरचे मंदिर तीन वेगवेगळ्या काळात झाल्याचे दाखले आहेत.मुख्य शिखर,सभामंडप आणि तटबंदी भिंत हे वेगवेगळ्या काळात तयार करण्यात आलेत. या मंदिरास सध्या दोन प्रवेशव्दार असून,मंदिर हेमाडपंथी आहे.मंदिर पुरातन असून,सुंदर नक्षीकाम करण्यात आले आहे.या मंदिरास राजश्री शाहू महाराजांनी जमीन दान केल्याचे दाखले सापडले आहेत,तसेच अहिल्यादेवी होळकर यांनी सभामंडप बांधून दिल्याचे पुरावे आहेत.कालांतराने मैलारपूर (नळदुर्ग) येथे कोरपे नावाच्या भक्ताने बिनशिखराचे मंदिर बांधले ( जुन्या मंदिरापासून अर्धा किलोमीटर अलिकडे)आणि श्री खंडोबाचे अणदूर येथे सव्वा दहा महिने आणि मैलारपूर (नळदुर्ग)येथे पावणे दोन महिने वास्तव्य राहील असा लेखी करार अणदूर आणि नळदुर्ग या दोन वेगवेगळ्या गावाच्या मानक-यांमध्ये करण्यात आला आणि आज अनेक वर्षे ही प्रथा गुण्यागोविंदाने सुरू आहे.गेल्या काही वर्षामध्ये अणदूरच्या श्री खंडोबा मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला आहे तसेच मैलारपूर मंदिरावर शिखर बांधण्यात आले आहे.त्याची अनेक वेळा रंगरंगोटीही करण्यात आलेली आहे.
श्री खंडोबाची दररोज दोन वेळा पूजा करण्यात येते.दगडी मुर्तीवर हळदीचा लेप देवून त्याव्दारे नाक,डोळे आणि मुकूट बसवण्यात येतो.रोज अलंकार आणि वस्त्र बदलण्यात येतात.दिवाळी पाडव्यादिवशी सोन्याचे दागदागिने घालण्यात येतात.या दिवशी श्री खंडोबाचे रूप पाहण्याजोगे असते.
अणदूरची श्री खंडोबा यात्रा मार्गशीर्ष शुध्द प्रतिपदेला म्हणजे देवदीपावली रोजी असते.त्यानंतर श्री खंडोबाचे मैलारपूर (नळदुर्ग)येथे प्रस्थान होते.मैलारपूरला दर रविवारी भाविकांची मोठी गर्दी असते.अनेकजण दर रविवारी खेटे म्हणून आवर्जुन हजेरी लावतात.भक्तगण हळदीचा भंडारा आणि खोबरे उधळतात.त्याचबरोबर तळी उचलणे,जागरण गोंधळ इत्यादी विधी पार पडत असतात.या ठिकाणी येणा-या भाविकांना दर रविवारी श्री खंडोबा देवस्थान ट्रस्टच्या वतीने मोफत अन्नदान केले जाते.त्यानंतर पौष पोर्णिमेला मैलारपूरला मोठी यात्रा भरते.यात्रेनंतर अष्टमीची पूजा करून श्री खंडोबा पुन्हा अणदूरला जातात.

मैलारपूर (नळदुर्ग) ते अणदूर हे अंतर फक्त चार किलोमीटर आहे,परंतु एकच मूर्ती मात्र तिची प्रतिष्ठापना दोन ठिकाणी करण्याचे महाराष्ट्रातील हे एकमेव उदाहरण आहे.मंदिरे दोन आणि देव एकच आहे.दोन्ही ठिकाणचे पुजारी एकच असून, मंदिर ट्रस्ट सुध्दा एकच आहे.
मैलारपूर ( नळदुर्ग ) आणि अणदूर ही ठिकाणे तुळजापूरपासून ३५ किलोमीटर, सोलापूरपासून ४० किलोमीटर अंतरावर आहेत.तुळजाभवानीचे दर्शन घेतल्यानंतर अणदूर आणि मैलारपूरच्या श्री खंडोबाचे दर्शन घेणे हे पुण्यकर्म मानले जाते. कारण तुळजाभवानी ही माता पार्वतीचे रूप तर श्री खंडोबा महादेवाचा अवतार आहे.
बोला,येळकोट येळकोट, जय मल्हार...
श्री खंडोबा आपल्या सर्व इच्छा आणि आकांक्षा पूर्ण करोत हीच श्री खंडोबा चरणी प्रार्थना...

- श्री खंडोबा देवस्थान ट्रस्ट
अणदूर - मैलारपूर ( नळदुर्ग )
ता.तुळजापूर,जि.उस्मानाबाद


-----

> श्री खंडोबाचे राजधानी ठिकाण - जेजुरी जि. पुणे
> पहिली पत्नी म्हाळसा, हिचे माहेर - नेवासे जि. नगर
> दुसरी पत्नी बाणाई, हिचे माहेर -चंदनपुरी ता. मालेगांव जि. नाशिक

> श्री खंडोबा आणि म्हाळसा यांचा विवाह पाली जि. सातारा येथे झाला होता...
> श्री खंडोबा आणि बाणाई यांचा विवाह नळदुर्ग जि. उस्मानाबाद येथे झाला होता...
> पालाई हिच्या भक्तीसाठी श्री खंडोबाने पहिला विवाह पाली येथे केला...
> नळ राजाची पत्नी दमयंती हिच्या भक्तीसाठी दुसरा विवाह नळदुर्ग येथे केला...

अणदूर - नळदुर्ग खंडोबा




नळदुर्ग व अणदूर ही दोन गावे ऐतिहासिक वारसा सांगणारी आहेत, या दोन ही ठिकाणी खंडोबाची मंदिरे आहेत, अणदूर येथे खंडोबा वर्षातील सव्वा दहा महिने  व नळदुर्ग येथे पावणे दोन महिने  वास्तव्य करतात असे मानले जाते, या मुळे हे खंडोबाचे एकच स्थान मानले जाते. अणदूर चे मुळ नाव आनंदपूर होते त्याचे पुढे अणदूर झाले. नळदुर्गला प्राचीन इतिहास आहे ईस १०४२ चे दरम्यान कल्याणीचे चालुक्य राज्याचा मांडलिक राजा नळ याचे हे राजधानीचे ठिकाण या नळराज्याने येथे रणमंडल नावाचा किल्ला बांधला तो पुढे नळदुर्ग म्हणून ओळखला जाऊ लागला आणि किल्ल्या जवळ लोकवस्ती होऊन नळदुर्ग गाव अस्तित्वात आले. अनेक धार्मिक संघर्ष आणि इतिहासाची पार्श्वभुमि असणारी ही भुमि इतिहासाच्या पाउल खुणा घेउन नांदत आहे.
नळदुर्ग उस्मानाबाद जिल्ह्यात उस्मानाबाद - सोलापूर या महामार्गावर उस्मानाबाद पासुन 55 किमी व सोलापूर पासुन 40  किमी अंतरावर आहे महामार्गावरून कडेला दिसतो तो नळदुर्ग किल्ला या किल्ल्या मधील दूर वरून नजरेत भरणारी वास्तु म्हणजे उपरी अथवा उपली बुरुज

 हा बुरुज टेहाळणी व तोफांचा मारा करण्यासाठी बांधण्यात आला होता याच ठिकाणी प्रथम खंडोबाचे मंदिर होते येथील नळराजा [ ईस १०४२ ] ची पत्नी दमयंती ही खंडोबा भक्त होती तिचे भक्ती मुळे खंडोबा प्रथम या ठिकाणी आले त्यावेळी हे ठिकाण नळराज्याचे रणमंडल या किल्लाचे बाहेर होते या ठिकाणी नळराज्याने खंडोबाचे मंदिर बांधले होते. ईस १६९४ मध्ये इब्राहीम आदिलशहाने येथे किल्ला बांधताना खंडोबा मंदिराचे जागेवरच उपरी बुरुज बांधला आणि हे मंदिर नष्ट झाले. बुरुजाचे पायऱ्या ज्या ठिकाणी मिळतात तेथे तळाशी असणारे पूर्वाभिमुख कोनाड्यात त्याची स्मृती म्हणून आजही लोक एका एका ओबड धोबड मूर्तीला लोक भंडारा वाहतात


पुढे पुन्हा खंडोबाची स्थापना व यात्रा सुरु करण्याचा प्रयत्न झाला, बादशाहने फर्मान काढले आणि किल्ल्याचे उत्तर तटाचे बुरुजाखाली दक्षिणाभिमुख कमानी पैकी पश्चिमेकडील कमानीत पूर्वाभिमुख ओटा बांधुन त्यावर खंडोबाची स्थापना करून यात्रा भरू लागली.


कालांतराने ग्रामस्थांनी बोरीनदी किनारी गावाचे वायव्येस खंडोबा मंदिर बांधले पण तेथेही काही अडचणी निर्माण झाले मुळे नळदुर्गचे उत्तरेस २.५ किमी अंतरावर खंडोबाचे हे मंदिर उभारण्यात आले. नळदुर्ग गावाचे पश्चिमेस महामार्गावर उतार दिशेस जाणारा रस्ता मिळतो या रस्त्याने सुमारे १ किमी अंतरावर गेल्यावर आजचे प्रचलित मंदिर दिसते तेथून पूर्वेकडे सुमारे १ किमी अंतरावर हे पश्चिमाभिमुख मंदिर आहे. हे मंदिर तिघई असुन प्रथम चार कमानी सोपा आहे गर्भगृहात एका कट्यावर सयोनी लिंग आहे. मंदिरावर वीट बांधकामाचे शिखर आहे, या मंदिरा मध्ये गाय मारल्याने देव अणदूर मध्ये जाऊन राहिला अशी दंतकथा आहे. ही घटना १७ व्या शतकाचे उत्तरार्धात घडल्याचे सांगतात आज हे मंदिर परितक्त्य अवस्तेत आहे.नंतर या मंदिराचे वायव्य दिशेस एक दगडी चोथरा आहे या चोथर्यावर यात्रेच्या वेळी देव अणदूर मधून आणून त्याची हंगामी स्थापना करून यात्रा उत्सव साजरा होऊ लागला.


या चोथऱ्याचे पश्चिमेस सुमारे १ किमी अंतरावर आजचे प्रचलित मंदिर आहे हे मंदिर उत्तराभिमुख असुन दगडी बांधकामातील या मंदिराची रचना तीन कमानी मंडप व गर्भगृह अशी आहे. कोरपे आडनावाचे भक्ताने बांधलेले मंदिर शिखर विरहित होते अलीकडे शिखराचे बांधकाम करण्यात आले आहे . गर्भगृहात एका चोथर्यावरसयोनी लिंग आहे मंदिराचे समोर कमान व त्यावर नगारखाना आहे. मंदिराचे उत्तरे कडून बोरी नदी वाहते.अणदूर नळदुर्ग मधून महामार्गाने सोलापूर कडे जाताना ४.५ किमी वर दक्षिणेकडे अणदूर कडे जाणारा रस्ता लागतो

या रस्त्याने आपण १ किमी अंतरावर मंदिराचे प्रवेशद्वारात पोहोचतो. हे मंदिर उत्तर्भिमुख असुन तट बंदीने युक्त आहे तटाची उंची ३५ फुट असुन पुर्व पश्चिम लांबी १९० तर दक्षिण उत्तर लांबी १०५ फुट आहे, तटबंदी चे ओवारीवर व दरवाज्यावर ईस १७४६ व १७४९ चे शिलालेख आहेत या वरून या तटबंदीचे काम या काळी झालेचे स्पष्ट होते.

उत्तर दरवाज्याने प्रवेश केल्यावर समोरच नदी मंडप लागतो तो खांबावर आधारलेला आहे याचे पुर्व, पश्चिम,उत्तर दिशांना अंगास बसण्यासाठी कट्टे असुन तीनही दिशेकडून रस्ते आहेंत या मंडपावर शिलालेख आहे या वरून या मंदिराचे काम ईस १७३९ मध्ये झाल्याचे दिसते.या मंडपाचे दक्षिणेस मुख मंडप असुन या मंडपात पश्चिम बाजुस देवाचे शेजघर. व पुर्वबाजुस जामदारखाना आहे.मंडपाचे दक्षिणेस उत्तराभिमुख गर्भगृह असुन गर्भगृहात आसनावर खंडोबाचे सयानी लिंग आहे या लिंगावर मुखवटा चढवुन सजावट केलेली असते यावर धातूची मेघदंम्बरी असुन मागील बाजुस प्रभावळ आहे मेघदंम्बरीचे दानही बाजुस खंडोबा म्हाळसा यांचे उभ्या मुर्ती आहेत .मंदिराचे प्रदक्षिणा मार्गावर पश्चिम बाजुस एक उत्तराभिमुख देवडी असुन त्यात नरसिह मुर्ती आहे .आवाराचे वायव्य कोपऱ्यात एक पार असुन पारावर शिवलिंग, उभा सूर्य , बैठी शिवपार्वती व गणेश मुर्ती आहेत ही शिल्पे व नरसिह अणदूर जवळील नारायणगुडी नावाच्या उधवस्त मंदिरातील असल्याचे सांगतात.मंदिराचे आवाराचे बाहेर पश्चिम बाजुस खंडोबाचे जुने मंदिर होते नळदुर्ग मधून खंडोबा येथे आणलेवर प्रथम त्याची स्थपना करून बांधलेले हे मंदिर इंदाई चे मंदिर ओळखले जात होते एका प्राकारात उंच चबुतरा त्यावर तीनकमानी पूर्वाभिमुख सोपा व पश्चिमेस गाभारा व त्यामध्ये सयोनी लिंग अशी त्याची रचना होते आज मात्र तेथे सभागृह बांधल्याचे ग्रामस्थ सांगतात .


नळदुर्ग किल्ला - हा किल्ला प्रथम कल्याणीचे चालुक्यचे मांडलिक असलेल्या नळ राज्याने [ईस १०४२] बांधला माती मध्ये बांधलेला ह्या किल्याचे ईस १३६१ ते१४८० मध्ये बहामनी काळात दगडामध्ये पुनबांधणी करण्यात आली. हा किल्ल्याचा भाग आजही रणमंडल म्हणून ओळखला जातो. आदिलशाही काळात यांचा विस्तार करण्यात आला. या किल्ल्या मधील पाणीमहल ही वास्तु १८५८ मध्ये उभी राहिली. बोरी नदीचे पाणी किल्ल्या कडे आणून त्यावर १७४ मी लांब अडीच ते चौदा मीटर रुंद व १९ मीटर उंचीचा बंधारा बांधुन यात पाणीमहल बांधण्यात आला. पावसाळ्यात बंधारा भरल्यावर वरील धबधबे वाहु लागतात गवाक्षा पुढून पाण्याचा पडदा सोडल्या सारखे दृश्य दिसते हा पाणीमहल, नवबुरुज [मांगिणी चा बुरुज] विशेष प्रेक्षणीय.
यात्रा - मार्गशीर्ष प्रतिपदेला अणदूर येथे मोठी यात्रा भरते रात्री देवाचा छबिना निघतो व पहाटे देव पालखीत नळदुर्ग कडे जाण्यासाठी प्रस्थान करतात चंपाषष्टी घटस्थापना व खंडोबा षडरात्र उत्सव नळदुर्ग मध्ये संपन्न होतात. मार्गशीर्ष प्रतिपदे पासुन पौष पौर्णिमे पर्यंत नळदुर्ग मध्ये मोठ्या प्रमाणावर यात्रा भरते नळदुर्ग खंडोबा चा प्रमुख उत्सव पौष पौर्णिमेस देवाचा छबिना निघतो या मिरवणुकीत काठ्या व लंगर तोडण्याचा कार्यक्रम होतो पहाटे देव पालखीतून अणदूर कडे प्रस्थान करतात.

श्री खंडोबाचे प्रमुख स्थान


श्री खंडोबाची महाराष्ट्र,कर्नाटक आणि आंध्रप्रदेशात एकूण १४ मुख्य स्थान आहेत.

 श्री खंडोबाची महाराष्ट्रातील आठ प्रसिध्द स्थान
१. जेजुरी (जि.पुणे)
२.अणदूर - नळदुर्ग (जि.उस्मानाबाद)
३. बाळे (सोलापूर शहर)
४. निमगाव (जि.पुणे)
५. शेंगुड (जि.नगर)
६. पाली (जि.सातारा)
७. माळेगाव (जि.नांदेड)
८. सातारे (जि.औरंगाबाद)

 श्री खंडोबाची कर्नाटकातील प्रसिध्द स्थान
१. आदी मैलार (बीदरपासून आठ किलो मीटर)
२. मंगसुळी (जि.धारवाड)
३. मैलारलिंग (जि.धारवाड)
४. मैलार - देवरगुड्ड (जि.धारवाड)
५. मैलार - मण्णमैलार (जि.बळ्ळारी)

 आंध्रप्रदेश
1. यादगिर

पहिले प्रेमपूर (आदी मैलार),दुसरे अणदूर - नळदुर्ग
पाली तिसरे, चौथे गड जेजुरी भूषण


याचा अर्थ अणदूर आणि नळदुर्ग हे दुसरे स्थान असून, ते दिवसेंदिवस अधिक लोकप्रिय होत आहे.येथील श्री खंडोबाची मुर्ती स्वयंभू असून,ते जागृत आणि जाज्वल्य देव आहे.येथील श्री खंडोबा नवसाला पावतो,म्हणूनच संपूर्ण महाराष्ट्र आणि कर्नाटकातील भाविक मोठ्या संख्यने येथे येत असतात.