G-PZND2NBDJ8
श्री खंडोबा देवस्थान , अणदूर - नळदुर्ग : संपर्क ७३८७९९४४११ ... Shri Khandoba Devasthan, Andur-Naldurg: Contact 7387994411

दमयंतीच्या भक्तीसाठी श्री खंडोबा - बाणाई विवाह नळदुर्गमध्ये...

मणी आणि मल्ल या उन्मत्त दैत्यांचा वध करण्यासाठी महादेव तथा शंकराने श्री खंडोबा तथा मल्हारी मार्तंडाचा अवतार धारण केला, ही आख्यायिका सर्वश्रुत आहे.मात्र श्री खंडोबा नळदुर्ग आणि अणदूरमध्ये कसे प्रकट झाले,या स्थानाचे महत्व काय,याची आख्यायिका थोडक्यात अशी ....
कृतयुगामध्ये नळदुर्ग येथील भुईकोट किल्ल्यात नळ - दमयंती राजा राणी - रहात होते.(नंतरचे नळ - दमयंती राजा राणी वेगळे आहेत). दमयंती राणी ही श्री खंडोबाची निस्सीम भक्त होती.राणी रोज पहाटे उठून  श्री खंडोबाच्या दर्शनासाठी आदी - मैलार (बीदरपासून दहा किलोमीटर अंतरावर,कर्नाटक राज्य) येथे जात होती.किल्ल्यामध्येच असलेल्या एका कल्पवृक्षावर बसून राणी आदी मैलारला जात असल्याचे मार्तण्ड भैरव ग्रंथामध्ये लिहिले आहे.( झी मराठीच्या  जय मल्हार मालिकेमध्येही हेच दाखवण्यात आले आहे) एक वर्षे उलटून गेल्यानंतर एकेदिवशी राजा पहाटे उठला तर राणी दिसेना,तेव्हा त्याला संशय आला आणि दुस-या दिवशी तिला न सांगता,तिच्या पाठीमागे गेला. राणी कल्पवृक्षावर बसली होती तर राजा झाडाच्या पारंब्या धरून लोंबकळत आदी मैलारला गेला.
राणी जेव्हा मंदिरात गेली, तेव्हा श्री खंडोबाने तुझा पती मागे लपला असल्याचे सांगून त्या दिवशी दर्शन दिले नाही. तेव्हा राजाने माफी मागून श्री खंडोबास नळदुर्गमध्ये प्रकट होण्याची विनंती केली. त्यानंतर दमयंतीच्या भक्तीसाठी आणि नळ राजाच्या विनंतीनुसार श्री खंडोबा नळदुर्गमध्ये प्रकट झाले.
श्री खंडोबाने दमयंती राणीला दिलेल्या दृष्टांताप्रमाणे नळ राजाने (आज ज्या ठिकाणी उपली बुरूज उभा आहे )त्या ठिकाणी मजुराकरवी खोदकाम केले असता, एका दगडी मुर्तीतून रक्ताची धार वरती आली.तोच दगड (तांदळा) राजाने श्री खंडोबाची मूर्ती म्हणून प्रतिष्ठापना केली. म्हणूनच या दगडी मुर्तीवर एका बाजूला खच पडलेली आजही दिसते. ही दगडी मूर्ती स्वयंभू असून,ती जागृत आहे.पुढे दमयंती राणीच्या भक्तीसाठी श्री खंडोबाने बाणाईला चंदनपुरीतून आणून याच भुईकोट किल्ल्यात लग्न केले आणि नंतर जेजुरीला नेले.श्री खंडोबा आणि बाणाईच्या विवाहस्थळामुळे श्री क्षेत्र अणदूर - मैलारपूर (नळदुर्ग) ला विशेष महत्व आहे.
कालांतराने नळ राजाने बांधलेले मंदिर १६६४ मध्ये इब्राहिम आदीलशहाने उद्ध्वस्त करून त्या ठिकाणी उपली बुरूज बांधला. त्यानंतर  श्री खंडोबाचे मंदिर बोरी नदीच्या काठावर बांधण्यात आले.या मंदिरातही १७ व्या शतकात एक अनिष्ट कृत्य करून मंदिर भ्रष्ट करण्यात आले, नंतर श्री खंडोबा मंदिर अणदूरला बांधण्यात आले. अणदूरचे मंदिर तीन वेगवेगळ्या काळात झाल्याचे दाखले आहेत.मुख्य शिखर,सभामंडप आणि तटबंदी भिंत हे वेगवेगळ्या काळात तयार करण्यात आलेत. या मंदिरास सध्या दोन प्रवेशव्दार असून,मंदिर हेमाडपंथी आहे.मंदिर पुरातन असून,सुंदर नक्षीकाम करण्यात आले आहे.या मंदिरास राजश्री शाहू महाराजांनी जमीन दान केल्याचे दाखले सापडले आहेत,तसेच अहिल्यादेवी होळकर यांनी सभामंडप बांधून दिल्याचे पुरावे आहेत.कालांतराने मैलारपूर (नळदुर्ग) येथे कोरपे नावाच्या भक्ताने बिनशिखराचे मंदिर बांधले ( जुन्या मंदिरापासून अर्धा किलोमीटर अलिकडे)आणि श्री खंडोबाचे अणदूर येथे सव्वा दहा महिने आणि मैलारपूर (नळदुर्ग)येथे पावणे दोन महिने वास्तव्य राहील असा लेखी करार अणदूर आणि नळदुर्ग या दोन वेगवेगळ्या गावाच्या मानक-यांमध्ये करण्यात आला आणि आज अनेक वर्षे ही प्रथा गुण्यागोविंदाने सुरू आहे.गेल्या काही वर्षामध्ये अणदूरच्या श्री खंडोबा मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला आहे तसेच मैलारपूर मंदिरावर शिखर बांधण्यात आले आहे.त्याची अनेक वेळा रंगरंगोटीही करण्यात आलेली आहे.
श्री खंडोबाची दररोज दोन वेळा पूजा करण्यात येते.दगडी मुर्तीवर हळदीचा लेप देवून त्याव्दारे नाक,डोळे आणि मुकूट बसवण्यात येतो.रोज अलंकार आणि वस्त्र बदलण्यात येतात.दिवाळी पाडव्यादिवशी सोन्याचे दागदागिने घालण्यात येतात.या दिवशी श्री खंडोबाचे रूप पाहण्याजोगे असते.
अणदूरची श्री खंडोबा यात्रा मार्गशीर्ष शुध्द प्रतिपदेला म्हणजे देवदीपावली रोजी असते.त्यानंतर श्री खंडोबाचे मैलारपूर (नळदुर्ग)येथे प्रस्थान होते.मैलारपूरला दर रविवारी भाविकांची मोठी गर्दी असते.अनेकजण दर रविवारी खेटे म्हणून आवर्जुन हजेरी लावतात.भक्तगण हळदीचा भंडारा आणि खोबरे उधळतात.त्याचबरोबर तळी उचलणे,जागरण गोंधळ इत्यादी विधी पार पडत असतात.या ठिकाणी येणा-या भाविकांना दर रविवारी श्री खंडोबा देवस्थान ट्रस्टच्या वतीने मोफत अन्नदान केले जाते.त्यानंतर पौष पोर्णिमेला मैलारपूरला मोठी यात्रा भरते.यात्रेनंतर अष्टमीची पूजा करून श्री खंडोबा पुन्हा अणदूरला जातात.

मैलारपूर (नळदुर्ग) ते अणदूर हे अंतर फक्त चार किलोमीटर आहे,परंतु एकच मूर्ती मात्र तिची प्रतिष्ठापना दोन ठिकाणी करण्याचे महाराष्ट्रातील हे एकमेव उदाहरण आहे.मंदिरे दोन आणि देव एकच आहे.दोन्ही ठिकाणचे पुजारी एकच असून, मंदिर ट्रस्ट सुध्दा एकच आहे.
मैलारपूर ( नळदुर्ग ) आणि अणदूर ही ठिकाणे तुळजापूरपासून ३५ किलोमीटर, सोलापूरपासून ४० किलोमीटर अंतरावर आहेत.तुळजाभवानीचे दर्शन घेतल्यानंतर अणदूर आणि मैलारपूरच्या श्री खंडोबाचे दर्शन घेणे हे पुण्यकर्म मानले जाते. कारण तुळजाभवानी ही माता पार्वतीचे रूप तर श्री खंडोबा महादेवाचा अवतार आहे.
बोला,येळकोट येळकोट, जय मल्हार...
श्री खंडोबा आपल्या सर्व इच्छा आणि आकांक्षा पूर्ण करोत हीच श्री खंडोबा चरणी प्रार्थना...

- श्री खंडोबा देवस्थान ट्रस्ट
अणदूर - मैलारपूर ( नळदुर्ग )
ता.तुळजापूर,जि.उस्मानाबाद


-----

> श्री खंडोबाचे राजधानी ठिकाण - जेजुरी जि. पुणे
> पहिली पत्नी म्हाळसा, हिचे माहेर - नेवासे जि. नगर
> दुसरी पत्नी बाणाई, हिचे माहेर -चंदनपुरी ता. मालेगांव जि. नाशिक

> श्री खंडोबा आणि म्हाळसा यांचा विवाह पाली जि. सातारा येथे झाला होता...
> श्री खंडोबा आणि बाणाई यांचा विवाह नळदुर्ग जि. उस्मानाबाद येथे झाला होता...
> पालाई हिच्या भक्तीसाठी श्री खंडोबाने पहिला विवाह पाली येथे केला...
> नळ राजाची पत्नी दमयंती हिच्या भक्तीसाठी दुसरा विवाह नळदुर्ग येथे केला...

अणदूर - नळदुर्ग खंडोबा




नळदुर्ग व अणदूर ही दोन गावे ऐतिहासिक वारसा सांगणारी आहेत, या दोन ही ठिकाणी खंडोबाची मंदिरे आहेत, अणदूर येथे खंडोबा वर्षातील सव्वा दहा महिने  व नळदुर्ग येथे पावणे दोन महिने  वास्तव्य करतात असे मानले जाते, या मुळे हे खंडोबाचे एकच स्थान मानले जाते. अणदूर चे मुळ नाव आनंदपूर होते त्याचे पुढे अणदूर झाले. नळदुर्गला प्राचीन इतिहास आहे ईस १०४२ चे दरम्यान कल्याणीचे चालुक्य राज्याचा मांडलिक राजा नळ याचे हे राजधानीचे ठिकाण या नळराज्याने येथे रणमंडल नावाचा किल्ला बांधला तो पुढे नळदुर्ग म्हणून ओळखला जाऊ लागला आणि किल्ल्या जवळ लोकवस्ती होऊन नळदुर्ग गाव अस्तित्वात आले. अनेक धार्मिक संघर्ष आणि इतिहासाची पार्श्वभुमि असणारी ही भुमि इतिहासाच्या पाउल खुणा घेउन नांदत आहे.
नळदुर्ग उस्मानाबाद जिल्ह्यात उस्मानाबाद - सोलापूर या महामार्गावर उस्मानाबाद पासुन 55 किमी व सोलापूर पासुन 40  किमी अंतरावर आहे महामार्गावरून कडेला दिसतो तो नळदुर्ग किल्ला या किल्ल्या मधील दूर वरून नजरेत भरणारी वास्तु म्हणजे उपरी अथवा उपली बुरुज

 हा बुरुज टेहाळणी व तोफांचा मारा करण्यासाठी बांधण्यात आला होता याच ठिकाणी प्रथम खंडोबाचे मंदिर होते येथील नळराजा [ ईस १०४२ ] ची पत्नी दमयंती ही खंडोबा भक्त होती तिचे भक्ती मुळे खंडोबा प्रथम या ठिकाणी आले त्यावेळी हे ठिकाण नळराज्याचे रणमंडल या किल्लाचे बाहेर होते या ठिकाणी नळराज्याने खंडोबाचे मंदिर बांधले होते. ईस १६९४ मध्ये इब्राहीम आदिलशहाने येथे किल्ला बांधताना खंडोबा मंदिराचे जागेवरच उपरी बुरुज बांधला आणि हे मंदिर नष्ट झाले. बुरुजाचे पायऱ्या ज्या ठिकाणी मिळतात तेथे तळाशी असणारे पूर्वाभिमुख कोनाड्यात त्याची स्मृती म्हणून आजही लोक एका एका ओबड धोबड मूर्तीला लोक भंडारा वाहतात


पुढे पुन्हा खंडोबाची स्थापना व यात्रा सुरु करण्याचा प्रयत्न झाला, बादशाहने फर्मान काढले आणि किल्ल्याचे उत्तर तटाचे बुरुजाखाली दक्षिणाभिमुख कमानी पैकी पश्चिमेकडील कमानीत पूर्वाभिमुख ओटा बांधुन त्यावर खंडोबाची स्थापना करून यात्रा भरू लागली.


कालांतराने ग्रामस्थांनी बोरीनदी किनारी गावाचे वायव्येस खंडोबा मंदिर बांधले पण तेथेही काही अडचणी निर्माण झाले मुळे नळदुर्गचे उत्तरेस २.५ किमी अंतरावर खंडोबाचे हे मंदिर उभारण्यात आले. नळदुर्ग गावाचे पश्चिमेस महामार्गावर उतार दिशेस जाणारा रस्ता मिळतो या रस्त्याने सुमारे १ किमी अंतरावर गेल्यावर आजचे प्रचलित मंदिर दिसते तेथून पूर्वेकडे सुमारे १ किमी अंतरावर हे पश्चिमाभिमुख मंदिर आहे. हे मंदिर तिघई असुन प्रथम चार कमानी सोपा आहे गर्भगृहात एका कट्यावर सयोनी लिंग आहे. मंदिरावर वीट बांधकामाचे शिखर आहे, या मंदिरा मध्ये गाय मारल्याने देव अणदूर मध्ये जाऊन राहिला अशी दंतकथा आहे. ही घटना १७ व्या शतकाचे उत्तरार्धात घडल्याचे सांगतात आज हे मंदिर परितक्त्य अवस्तेत आहे.नंतर या मंदिराचे वायव्य दिशेस एक दगडी चोथरा आहे या चोथर्यावर यात्रेच्या वेळी देव अणदूर मधून आणून त्याची हंगामी स्थापना करून यात्रा उत्सव साजरा होऊ लागला.


या चोथऱ्याचे पश्चिमेस सुमारे १ किमी अंतरावर आजचे प्रचलित मंदिर आहे हे मंदिर उत्तराभिमुख असुन दगडी बांधकामातील या मंदिराची रचना तीन कमानी मंडप व गर्भगृह अशी आहे. कोरपे आडनावाचे भक्ताने बांधलेले मंदिर शिखर विरहित होते अलीकडे शिखराचे बांधकाम करण्यात आले आहे . गर्भगृहात एका चोथर्यावरसयोनी लिंग आहे मंदिराचे समोर कमान व त्यावर नगारखाना आहे. मंदिराचे उत्तरे कडून बोरी नदी वाहते.अणदूर नळदुर्ग मधून महामार्गाने सोलापूर कडे जाताना ४.५ किमी वर दक्षिणेकडे अणदूर कडे जाणारा रस्ता लागतो

या रस्त्याने आपण १ किमी अंतरावर मंदिराचे प्रवेशद्वारात पोहोचतो. हे मंदिर उत्तर्भिमुख असुन तट बंदीने युक्त आहे तटाची उंची ३५ फुट असुन पुर्व पश्चिम लांबी १९० तर दक्षिण उत्तर लांबी १०५ फुट आहे, तटबंदी चे ओवारीवर व दरवाज्यावर ईस १७४६ व १७४९ चे शिलालेख आहेत या वरून या तटबंदीचे काम या काळी झालेचे स्पष्ट होते.

उत्तर दरवाज्याने प्रवेश केल्यावर समोरच नदी मंडप लागतो तो खांबावर आधारलेला आहे याचे पुर्व, पश्चिम,उत्तर दिशांना अंगास बसण्यासाठी कट्टे असुन तीनही दिशेकडून रस्ते आहेंत या मंडपावर शिलालेख आहे या वरून या मंदिराचे काम ईस १७३९ मध्ये झाल्याचे दिसते.या मंडपाचे दक्षिणेस मुख मंडप असुन या मंडपात पश्चिम बाजुस देवाचे शेजघर. व पुर्वबाजुस जामदारखाना आहे.मंडपाचे दक्षिणेस उत्तराभिमुख गर्भगृह असुन गर्भगृहात आसनावर खंडोबाचे सयानी लिंग आहे या लिंगावर मुखवटा चढवुन सजावट केलेली असते यावर धातूची मेघदंम्बरी असुन मागील बाजुस प्रभावळ आहे मेघदंम्बरीचे दानही बाजुस खंडोबा म्हाळसा यांचे उभ्या मुर्ती आहेत .मंदिराचे प्रदक्षिणा मार्गावर पश्चिम बाजुस एक उत्तराभिमुख देवडी असुन त्यात नरसिह मुर्ती आहे .आवाराचे वायव्य कोपऱ्यात एक पार असुन पारावर शिवलिंग, उभा सूर्य , बैठी शिवपार्वती व गणेश मुर्ती आहेत ही शिल्पे व नरसिह अणदूर जवळील नारायणगुडी नावाच्या उधवस्त मंदिरातील असल्याचे सांगतात.मंदिराचे आवाराचे बाहेर पश्चिम बाजुस खंडोबाचे जुने मंदिर होते नळदुर्ग मधून खंडोबा येथे आणलेवर प्रथम त्याची स्थपना करून बांधलेले हे मंदिर इंदाई चे मंदिर ओळखले जात होते एका प्राकारात उंच चबुतरा त्यावर तीनकमानी पूर्वाभिमुख सोपा व पश्चिमेस गाभारा व त्यामध्ये सयोनी लिंग अशी त्याची रचना होते आज मात्र तेथे सभागृह बांधल्याचे ग्रामस्थ सांगतात .


नळदुर्ग किल्ला - हा किल्ला प्रथम कल्याणीचे चालुक्यचे मांडलिक असलेल्या नळ राज्याने [ईस १०४२] बांधला माती मध्ये बांधलेला ह्या किल्याचे ईस १३६१ ते१४८० मध्ये बहामनी काळात दगडामध्ये पुनबांधणी करण्यात आली. हा किल्ल्याचा भाग आजही रणमंडल म्हणून ओळखला जातो. आदिलशाही काळात यांचा विस्तार करण्यात आला. या किल्ल्या मधील पाणीमहल ही वास्तु १८५८ मध्ये उभी राहिली. बोरी नदीचे पाणी किल्ल्या कडे आणून त्यावर १७४ मी लांब अडीच ते चौदा मीटर रुंद व १९ मीटर उंचीचा बंधारा बांधुन यात पाणीमहल बांधण्यात आला. पावसाळ्यात बंधारा भरल्यावर वरील धबधबे वाहु लागतात गवाक्षा पुढून पाण्याचा पडदा सोडल्या सारखे दृश्य दिसते हा पाणीमहल, नवबुरुज [मांगिणी चा बुरुज] विशेष प्रेक्षणीय.
यात्रा - मार्गशीर्ष प्रतिपदेला अणदूर येथे मोठी यात्रा भरते रात्री देवाचा छबिना निघतो व पहाटे देव पालखीत नळदुर्ग कडे जाण्यासाठी प्रस्थान करतात चंपाषष्टी घटस्थापना व खंडोबा षडरात्र उत्सव नळदुर्ग मध्ये संपन्न होतात. मार्गशीर्ष प्रतिपदे पासुन पौष पौर्णिमे पर्यंत नळदुर्ग मध्ये मोठ्या प्रमाणावर यात्रा भरते नळदुर्ग खंडोबा चा प्रमुख उत्सव पौष पौर्णिमेस देवाचा छबिना निघतो या मिरवणुकीत काठ्या व लंगर तोडण्याचा कार्यक्रम होतो पहाटे देव पालखीतून अणदूर कडे प्रस्थान करतात.

श्री खंडोबाचे प्रमुख स्थान


श्री खंडोबाची महाराष्ट्र,कर्नाटक आणि आंध्रप्रदेशात एकूण १४ मुख्य स्थान आहेत.

 श्री खंडोबाची महाराष्ट्रातील आठ प्रसिध्द स्थान
१. जेजुरी (जि.पुणे)
२.अणदूर - नळदुर्ग (जि.उस्मानाबाद)
३. बाळे (सोलापूर शहर)
४. निमगाव (जि.पुणे)
५. शेंगुड (जि.नगर)
६. पाली (जि.सातारा)
७. माळेगाव (जि.नांदेड)
८. सातारे (जि.औरंगाबाद)

 श्री खंडोबाची कर्नाटकातील प्रसिध्द स्थान
१. आदी मैलार (बीदरपासून आठ किलो मीटर)
२. मंगसुळी (जि.धारवाड)
३. मैलारलिंग (जि.धारवाड)
४. मैलार - देवरगुड्ड (जि.धारवाड)
५. मैलार - मण्णमैलार (जि.बळ्ळारी)

 आंध्रप्रदेश
1. यादगिर

पहिले प्रेमपूर (आदी मैलार),दुसरे अणदूर - नळदुर्ग
पाली तिसरे, चौथे गड जेजुरी भूषण


याचा अर्थ अणदूर आणि नळदुर्ग हे दुसरे स्थान असून, ते दिवसेंदिवस अधिक लोकप्रिय होत आहे.येथील श्री खंडोबाची मुर्ती स्वयंभू असून,ते जागृत आणि जाज्वल्य देव आहे.येथील श्री खंडोबा नवसाला पावतो,म्हणूनच संपूर्ण महाराष्ट्र आणि कर्नाटकातील भाविक मोठ्या संख्यने येथे येत असतात.

मार्तंड भैरव अवतार कथा

कृतयुगामध्ये निसर्गरम्य व शांत अशा मणिचूल पर्वतावर धर्मपुत्र सप्तऋषी आपल्या परिवारासह, धर्माचरण, तपस्या व होमहवन आदी नित्यकर्मे आनंदात व्यतीत करीत होते.त्याच सुमारास मल्लासुर दैत्याने मणिचूल पर्वतावर आक्रमण केले व तेथील तपोवन उद्ध्वस्त केले,त्यांचे आश्रम नष्ट करून गायी वासरांचा वध केला ऋषी पत्नींची विटंबना केली.अशा रीतीने त्या नंदनवनाची वाताहत लावून मल्लासुर आपल्या दैत्यसेनेसह निघून गेला परंतु घडलेल्या प्रकाराने भयभीत झालेल्या ऋषी मुनींनी देवाचा धावा केला व नारद ऋषींच्या कथनाधारे दुर्वास शिष्य लवा ऋषींच्या अभिमंत्रित केलेल्या धवलगिरीच्या परीसरामध्ये आपल्या कुटुंबियांना सुरक्षित ठिकाणी ठेवून इंद्र देवाकडे जाण्यासाठी प्रस्थान ठेवले.

इंद्र देवाकडे आपले दुःख व्यक्त करून अभय मागितले.तेव्हा देवेंद्राने मल्लासुर व मणीसूर दैत्य बंधूंना ब्रम्हदेवा कडून मिळालेला अजेयत्वाच्या वरदानाचा वृतांत कथन केला व आपली असमर्थता प्रदर्शित केली.त्याबरोबरच वैकुंठामध्ये जाऊन विष्णुंची मदत घेण्यासठी सुचविले,दुर्दैवाने विष्णुंकडूनही नकार मिळाला तदनंतर धर्मऋषी कैलासावर भगवान शंकर महादेवाची मदत घेण्यासाठी पोहोचले.ऋषीमुखातून मल्लासुर दैत्याचे दुर्वर्तन ऐकून भगवान शंकर क्रोधीत झाले व त्यांनी आपल्या जटा आपटल्या, त्याबरोबर त्या उर्जेतून एक महामारी उत्पन्न झाली तिला ऋषी मुनींनी घृत अर्थात तूप पाजून शांत केले म्हणून तिचे नाव घृतमारी असे पडले.मणी-मल्ल दैत्यांचा संहार करण्यासठी सुर्यासारखे तेजस्वी आणि भीतीदायक असे मार्तंड भैरवाचे रूप धारण केले.गळ्यात सर्पभूषणे,कानात कुंडले,हातात त्रिशूल,डमरू,खड्ग आणि पूर्णपात्र असे मार्तंड भैरव सपत्नीक नंदीवर आरूढ होवून , कार्तिक स्वामींच्या नेतृत्वाखाली सप्त कोटि गणांसह धवलगिरीवर अवतरले.

या ठिकाणी सैन्याची व्यवस्था लावून युद्धासाठी प्रस्थान ठेवले म्हणून हा परिसर प्रस्थपीठ म्हणून ओळखला जावू लागला.मल्लासूराला दूतांकरवी हि वार्ता समजल्या नंतर त्याने शिवाचा उपहास केला परंतु प्रत्यक्ष देवसैन्य पाहिल्यानंतर मनातून तो घाबरला.त्याने आपले धुरंधर योद्धे व दैत्य सेनेसह युद्धासाठी सिद्धता केली,दोन्ही सैन्ये समोरासमोर भिडताच घनघोर युद्धास सुरवात झाली.मार्तंड भैरवाच्या देव सेनेने राक्षसांची आघाडीची फळी कापून काढताच,मल्लासुराने खड्गदृष्ट नामक दैत्याला युद्धासाठी धाडले.कार्तिकस्वामीने त्याचा पराभव करून त्याला ठार केले.त्यानंतर येणा-या प्रत्येक दैत्याचा संहार देवसेनेकडून केला गेला यामध्ये उल्कांमुखाचा श्रीगणेशाने तर कुंतलोमाचा महानंदीने पराभव करून त्यांना ठार केले.

दैत्य सेनेचा पराभव पाहून मल्लासुर क्रोधिष्ठ झाला व त्याने आपला धाकटा भाऊ शूर योद्धा मणीसूराला रणांगणावर पाठविले, त्याचा संहार करण्यासाठी मार्तंड भैरव स्वतः युद्धासाठी सज्ज झाले.सुरवातीच्या घणाघाती युद्धानंतर मार्तंड भैरवाने त्रिशूल व खड्ग आदी शस्त्रांनी त्याला घायाळ करून जमिनीवर पाडले त्याच्या मस्तकावर पाय देवून त्याला चिरडणार तोच मार्तंडाच्या पदस्पर्शाने मणी दैत्याची मती फिरली व त्याने देवस्तुती करून इष्ट वरदान देण्याचे वचन घेतले, "प्रभो,तुझे चरणाखाली माझे शीर असावे तसेच माझे अश्वारूढ रूप तुझे सानिध्यात असावे". मणीसूराच्या भक्तीने संतुष्ट झालेल्या मार्तंड भैरवाने मल्लासूरास जीवदान देण्याचे ठरविले आणि त्यास युद्धापासून परावृत्त करण्यासाठी श्रीविष्णूंना मध्यस्थी करण्यास सांगितले.दुराग्रही व अहंकारी मल्लासूर दैत्याने श्री विष्णूंचा सलोखा मान्य केला नाही याउलट आपल्या प्रचंड सेनेचा व सहका-यांचा संहार पाहून क्रोधीत झालेल्या मल्लासुराने उन्मत्तपणे मार्तंड भैरवास युद्धाचे आव्हान दिले.

त्यावर देवसेनेतर्फे घृतमारी युद्धामध्ये उतरली या महाभयंकर शक्तीने दैत्य सेनेचा सुरुवातीचा तीव्र आवेग कमी केला. त्याबरोबरच मार्तंड भैरव स्वतः युद्धामध्ये उतरले मल्लसुराशी सर्व शस्त्र व अस्त्रांसह महायुद्ध झाले.बराचवेळ चाललेल्या युद्धामध्ये कोणीही माघार घेत नव्हते पराक्रमी मल्लासूराने आपले सर्व कौशल्य पणाला लावले पण त्याचा काही उपयोग झाला नाही शेवटी मार्तंड भैरवाने खड्ग हाती घेऊन त्याचा घाव वर्मी घातला व मल्लासूराला भूमीवर पाडले आपला अंतकाळ जवळ आल्याचे पाहून दैत्याने मार्तंड भैरवाचे चरण धरले व देवस्तुती करू लागला त्याबरोबरच श्रेष्ठ अशी मानसपूजा हि आरंभिली, या सर्व प्रकाराने मार्तंड भैरव मनी संतोषले व त्याला वरदान मागण्यास सांगितले. यावर तो म्हणाला " हे प्रभो माझे नाव तुमच्या नावापूर्वी यावे आणि माझे शीर सदैव आपल्या चरणतळी निरंतर असावे." मणीसूर व मल्लासूर दैत्यांना पाताळात धाडल्या नंतर मार्तंड भैरावांनी 'प्रस्थपीठ' जवळील टेकडीवर आपली राजधानी स्थापन केली. दैत्यांवरील जय मिळवल्यामुळे या पर्वताला 'जयाद्री' नाम मिळाले.दैत्यासूरांचा संहार करण्यासाठी खड्ग अर्थात खंडा हाती घेतला म्हणून खंडोबा तर म्हाळसेचा पती म्हणून म्हाळसाकांत भाविक भक्तांना सदैव आनंद देणारा असा सदानंद

श्री खंडोबा कँलेडरचे थाटात प्रकाशन

नळदुर्ग - श्री खंडोबा देवस्थान ट्रस्टच्या वतीने काढण्यात आलेल्या श्री खंडोबा कँलेडरचे प्रकाशन जिल्हा परिषद उपाध्यक्ष संजय पाटील - दुधगावकर यांच्या हस्ते बुधवारी सायंकाळी मंदिर समितीच्या कार्यालयात करण्यात आले.
श्री खंडोबा देवस्थानने यावर्षी प्रथमच श्री खंडोबाचे छायाचित्र आणि माहिती असलेले १५ बाय २० आकाराचे कँलेडर प्रसिध्द केले आहे.या कँलेडरचे प्रकाशन एका छोट्याच्या समारंभात करण्यात आले.यावेळी उस्मानाबादचे ज्येष्ठ पत्रकार राजाभाऊ वैद्य,ट्रस्टचे अध्यक्ष प्रकाश मोकाशे, उपाध्यक्ष दिलीप शिवराम मोकाशे, सचिव सुनील ढेपे, सदस्य अशोक मोकाशे, दिलीप गोविंदराव मोकाशे, मराठवाडा लाइव्हचे संपादक सुनील बनसोडे आदी उपस्थित होते.
उपस्थितांचे स्वागत सुधाकर ढेपे,प्रकाश ढोबळे,रमेश मोकाशे आदींनी केले.
यावेळी संजय पाटील - दुधगावकर आणि राजाभाऊ वैद्य यांचा शाल,श्रीफळ, खंडोबाचा फोटो देवून आणि फेटा बांधून सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक भाषणात सचिव सुनील ढेपे यांनी ट्रस्टने केलेल्या विकास कामांची माहिती दिली.
यावेळी उपाध्यक्ष संजय पाटील यांनी यात्रेच्या दिवशी पाणी टंचाई भासू देणार नाही, तसेच मंदिराच्या विकास कामासाठी हातभार लावू,असे आश्वासन दिले.शेवटी उपस्थितांचे आभार अध्यक्ष प्रकाश मोकाशे यांनी मानले.

Khandoba Info (Kannad)


खंडोबाचा करार


लाखो भाविकांच्या उपस्थितीत खंडोबाची यात्रा सुरळीत

नळदुर्ग - तुळजापूर तालुक्यातील मैलारपूर येथील कुलदैवत श्री खंडोबाची यात्रा मोठ्या उत्साहाने व शांततेत पार पडली.गेल्या तीन दिवसांत दहा लाखाहुन अधिक भाविकांनी रांगेत आणि शिस्तीत दर्शन घेतले. यात्रेनिमित्त श्री खंडोबाचा वाजत - गाजत छबिना काढण्यात आला तसेच विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले.
मैलारपूरचा श्री खंडोबा महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील लाखो भाविकांचे कुलदैवत आहे. यात्रेसाठी किमान पाच लाख भाविक येत असतात.यंदा मात्र रेकॉर्ड ब्रेक यात्रा पार पडली. श्री खंडोबाची यात्रा पौष पोर्णिमेला पार पडत असते. यंदा रविवार व सोमवार सलग दोन दिवस पोर्णिमा आल्याने रविवारी पहाटे पासूनच भाविकांची मोठी रांग लागली. रविवार,सोमवार तसेच मंगळवार असे तीन दिवस सलग रांग चालू होती.
यात्रेसाठी श्री खंडोबा मंदिराचा भोवतालचा संपूर्ण माळराण भाविकांनी फुलून गेले होते. जिकडे - तिकडे वाहनांची तसेच माणसांची गर्दी दिसून आली.यात्रेसाठी विविध ठिकाणाहून सातशेहून अधिक नंदीध्वजाचे (काठ्यांचे )आगमन झाले होते.भाविकांना अंगोळीसाठी बोरी नदीच्या कालव्यातून पाणी सोडण्यात आले होते.तसेच नदीच्या घाटावरही भाविकांनी अंगोळ करून, श्री खंडोबाचे दर्शन घेतले.तसेच काही भाविकांनी दंडवत घालत आपला नवस पुर्ण केला.भंडारा तसेच खोबरे उधळून येळकोट, येळकोट जयघोष केला. भाविकांनी उधळलेल्या भंडा-यामुळे मंदिर परिसर पिवळा झाला होता.भाविकही भंडा-यांने न्हाहून निघाले होते.
श्री खंडोबाला पुरण - पोळीचा नैवेद्य चालतो.भाविकांनी आपापल्या नेमूण दिलेल्या ठिकाणी चूल मांडून स्वयपाक केला तसेच नैवेद्य पण तयार करून श्री खंडोबा नैवैद्य दाखविला.तसेच श्रीफळ फोडून तसेच चांदीचे तसेच पितळ्याचे घोडे वाहून नवस पुर्ण केला.
दर्शनासाठी श्री खंडोबा देवस्थानच्या वतीने दर्शन बारी तयार करण्यात आली होती.त्यामुळे भाविकांनी रांगेत तसेच शिस्तीस दर्शन घेतले.तसेच मंदिरावर विद्युत रोषणाई करण्यात आल्यामुळे रात्रीच्या वेळी मंदिर उजाळून निघाले होते.दर्शन झाल्यानंतर बच्चे कंपनीसाठी पाळणे, खेळणी तसेच करमणुकीचे साधने असल्यामुळे भाविकांनी त्याचा आनंद लुटला.
वाजत - गाजत छबिना
सोमवारी मध्यरात्री बारा वाजता नळदुर्गच्या मानाच्या नंदीध्वजाचे आगमन झाले.त्यानंतर अणदूरच्या श्री खंडोबा मंदिरातील दोन्ही घोड्याचे आगमन झाले. यावेळी शोभेचे दारूकाम करण्यात आले.त्यानंतर मध्यरात्री दोन वाजता मंदिर ट्रस्टच्या वतीने अणदूर व नळदुर्ग मानक-यांचा सत्कार करण्यात आला.त्यानंतर पहाटे तीन वाजता छबिन्यास प्रारंभ झाला. समोर दोन घोडे, पालखी आणि गावागावांतून आलेल्या काठ्या समवेत नदीकाळावरील मसोबा , जुने मंदिर मार्गे वाजत - गाजत छबिना काढण्यात आला.हलगीच्या तालावर नाचणारे वारू, विविद्य वाद्यात येळकोट, येळकोट जय मल्हारचा जयघोष करीत श्री खंडोबाचा छबिना सकाळच्या सहा वाजण्याच्या सुमारास पार पडला.
यात्रा शांततेत पार पडण्यासाठी श्री खंडोबा देवस्थान ट्रस्ट व पुजारी मंडळाने सलग तीन दिवस परिश्रम घेतले.तसेच नळदुर्ग पोलीस स्टेशनच्या पोलीसांनी रात्रंदिवस डोळ्यात तेल घालून काम केले.पोलीस निरीक्षक शेटगार यांनी सलग तीन दिवस जागे राहून काम केल्याने यात्रा शांततेत पार पडली.पोलीसासाठी श्री खंडोबा देवस्थानने जेवण्याची व राहण्याची व्यवस्था करून जिव्हाळा जपला.

मैलारपूर श्री खंडोबाची यात्रा 2012